उरण शिवसत्ता टाइम्स (प्रविण पाटील) :-
उरण नगरपालिका हद्दीत पुनर्विकास व नवीन इमारती बांधण्याचे काम बिल्डर लॉबी कडून सुरू आहे. मात्र हे करीत असताना बिल्डरांकडून नियमांची पायमल्ली करून सार्वजनिक व मुख्य वाहतुकीच्या पालवी हॉस्पिटल ते कामठा रस्त्यावर कब्जा करून काम सुरू आहे…याबाबत नगरपालिका आधिकारी वर्गाकडे विचारणा केली असता ते याबाबत बोलणे टाळून आपल्याकडे कोणाची तक्रार नसल्याचे नगररचनाकार निखिल ढेरे सांगतात. यावरून कोणाची तक्रार आली तर कारवाई करणार असे थातूरमातूर उत्तर देऊन आपली कातडी वाचविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे उघड होते. तसेच उरण शहरातील सर्वसामान्य जनतेच्या समस्यांकडे लक्ष देण्यास अधिकारी वर्गाना वेळ नाही.यामुळे उरण शहरातील जनतेत संतापाची लाट पसरत नगरपालिका प्रशासन बिल्डर लॉबीच्या ताटाखालचे मांजर बनले असल्याचा आरोप केला जात आहे.?
उरण नगरपालिका हद्दीत प्रशासकीय कारभार असल्याने बिल्डर लॉबीने काही सत्ताधाऱ्यांना हाताशी धरून अधिकारी वर्गाकडून अनेक इमारतींना मोठमोठे टॉवर उभारण्यासाठी परवानगी घेतली आहे…या परवानगी नियमांची पायमल्ली करून घेतल्या असल्याचे अधिकृत सूत्रांकडून समजते…त्यात खोटी कागदपत्रे सादर केल्याची धक्कादायक माहिती पुढे येत आहे? याबाबत माहितीच्या अधिकारात माहिती मागितली असता ती देण्यास टाळाटाळ केली जात आहे.
नगरपालिका प्रशासनाने दिलेल्या परवानगीनुसार इमारतींचे काम न होता ,मनमानी कारभाराप्रमाणे बिल्डरांकडून काम सुरू आहे…काम करीत असताना वाहतुकीसाठी मुख्य रस्ता असलेल्या रस्त्यावर अवजड वाहन उभे करीत इमारतींचे बांधकाम सुरू आहे. तसेच सदरचे काम हे पोलीस संरक्षणात सुरू आहे. काम सुरू असताना नगररचनाकार निखिल ढेरे यांना अनेकवेळा मोबाईलवर संपर्क साधूनही त्यांनी प्रतिसाद दिला नाही. यावरून नियमांची पायमल्ली सुरू असताना कोणी तक्रार केली तर त्याला उत्तर देऊ नये म्हणून टाळले जात असल्याचे उघड होत आहे. याबाबत सत्ताधारी नगरसेवकांकडे विचारणा केली असता ते उडवाउडवीची उत्तरे देत आहेत.
आजच्या घडीला उरण शहरात अनेक बिल्डर लॉबिंची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. यातील बहुतांश कामे ही नियमांचे उल्लंघन करून सुरू आहेत. याबाबत तक्रार करूनही नगरपालिका अधिकारी वर्गाकडून कोणतीच कारवाई केली जात नाही…भविष्यात याचे दुष्परिणाम येथील रहिवाशांना भोगावे लागणार आहे…त्याचे कोणतेही सोयरसुतक अधिकारी वर्गाना नसून ते आर्थिक हित साधत मालामाल होऊन काही वर्षांनी बदली करून जातील अशी चर्चा येथील जनतेत सुरू आहे…