रायगड शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-
महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाच्या पहिल्याच विस्तारात रविवारी रायगडला आदिती तटकरे आणि भरत गोगावले यांच्या रुपाने दोन मंत्रीपदे मिळाली आहेत…यामुळे रायगडात महायुतीची ताकद आणखी वाढली आहे. मात्र जिल्ह्याचे पालकमंत्री मिळविण्यावरुन गोगावले आणि तटकरे यांच्यातील राजकीय संघर्ष पुन्हा उफाळून येण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे.आता सर्वांनाच उत्सुकता आहे ती जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची. ज्येष्ठतेनुसार पालकमंत्रीपदी भरत गोगावले विराजमान होणार की खा. सुनील तटकरे हे राजकीय कुरघोडी करुन पुन्हा पालकमंत्रीपद आदिती तटकरे यांना मिळवून देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महाविकास आघाडीचे सरकार असताना त्यावेळी पालकमंत्री असलेल्या आदिती तटकरे यांना आ. भरत गोगावले, आ. महेंद्र दळवी, आ. महेंद्र थोरवे या एकत्रित शिवसेनेच्या आमदारांनी कडाडून विरोध केला होता. त्यावरुन खा. सुनील तटकरे आणि आ. भरत गोगावले यांच्यात राजकीय वादविवादही झाले होते. पण नंतर राजकीय बदलानंतर महायुती सरकारच्या काळात शिवसेनेचे उदय सामंत हे रायगडचे पालकमंत्री झाले. आता त्याच मुद्यावरुन पुन्हा राजकीय संघर्ष निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.शनिवारी नागपूर येथे राज्य मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला. यामध्ये मागील सरकारात राष्ट्रवादी (अजित पवार) च्या आदिती तटकरे या महिला बालकल्या विभागाच्या मंत्री होत्या. त्यांना पुन्हा मंत्रीमंडळात स्थान देण्यात आले आहे. तर मागील अडीच वर्षापासून मंत्री बनवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या शिवसेना (शिंदे) आम. भरत गोगावले यांनाही मंत्री करुन त्यांची स्वप्नपूर्ती करण्यात आली आहे. आतापर्यंतच्या रायगडच्या राजकीय इतिहासात प्रथमच दोन कॅबिनेट मंत्रीपदे जिल्ह्याला मिळाली आहेत. या दोन मंत्र्यांमुळे रायगडच्या विकासाचा मार्ग आता खुला झाल्याची प्रतिक्रिया सर्व स्तरातून व्यक्त होत आहे…