पेण शिवसत्ता टाइम्स (देवा पेरवी) :-
सामाजिक कार्यकर्ता म्हणून रायगड जिल्ह्यातील अवैध धंदे, लेडीज बार, मटका, जुगार याबाबत हरीश बेकावडे यांनी यापूर्वी फार मोठे आंदोलने करून सदरचे व्यवसाय व डान्सबार बंद केले होते… त्यावेळी स्वर्गीय आर.आर.पाटील (गृहमंत्री) व स्थानिक अधिकाऱ्यांनी चांगले सहकार्य व तत्परता दाखवली होती… मात्र आता पुन्हा त्याच गोष्टींचा सुळसुळाट सुरू झाला असून, अधिकारी माहिती असून सुद्धा मूग घेऊन गप्प आहेत… याबाबत शंका वाटते त्यामुळे रायगड जिल्ह्यासाठी नवीन आयएएस दर्जाचे जिल्हाधिकारी व आयपीएस दर्जाचे पोलीस अधीक्षक यांची तात्काळ नियुक्ती करा अशी मागणी पेणचे सामाजिक कार्यकर्ते हरिष बेकावडे यांनी मुख्यमंत्री, गृहमंत्री व संबंधित अधिकाऱ्यांना लेखी पत्र लिहून केली आहे…
अलीकडे सर्वच नियम धाब्यावर बसून डान्सबार मालकांनी हैदोस सुरू केला आहे… याबाबत बेकावडे यांनी गेल्या वर्षी 27/12/2023 रोजी मंत्री महोदयांना व अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार करून सुद्धा कोणतीही कारवाई झाली नाही, उलट पक्षी पेट्या व खोके घेऊन अवैध धंद्याचा सुळसुळाट सुरू ठेवला…. मटका, जुगार, डान्सबार, ड्रग्स माफिया, बेकायदेशीर भंगार माफिया, रेव्ह पार्टी, बलात्कार घटना, अपघात, खून, दरोडे याचबरोबर कायदा सुव्यवस्था बिघडणे, व्यसनाधीनता व माती माफिया, वाळूमाफिया, उत्खनन माफिया, वन माफिया यांनी चालवलेला हैदोस रायगड जिल्ह्याला नामशेष करत आहे… छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडात असे व्यवसाय चालू असताना त्याकडे दुर्लक्ष करणे व त्याचबरोबर मुंबईच्या मंत्रालयापासून जवळच असलेल्या रायगड जिल्ह्यात अशा गोष्टी चालू असणे हे गंभीर नव्हे तर महाराष्ट्राला काळीमा फासणारी गोष्ट आहे… यातूनच भविष्यात गुंडगिरी निर्माण होऊन भविष्यात छोटे-मोठे परप्रांतीय “अक्का” रायगड जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यात निर्माण होऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडात नको ती परिस्थिती निर्माण झाल्यास त्यास जबाबदार कोण? याचाही महाराष्ट्र शासनाने विचार करावा आणि म्हणूनच अशा गोष्टींना तात्काळ बंदी घालण्यासाठी आयपीएस दर्जाचे पोलीस अधीक्षक रायगडसाठी तात्काळ नेमणे गरजेचे आहे…
एवढेच नव्हे तर रायगडच्या जिल्हाधिकारी यांच्या कारकिर्दीत रायगड जिल्हाधिकारी कार्यालय ते प्रांत कार्यालय, तहसील पासून तलाठी कार्यालयापर्यंत व जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकाऱ्यात येणारे सर्वच विभागाची कार्यालये यामध्ये दलालांचा सुळसुळाट सुरू असताना कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नाही… शिवाय जिल्ह्यात येणारे विविध प्रकल्प, कंपन्या यांनी स्थानिक शेतकरी, प्रकल्पग्रस्त यांच्यावर अन्याय चालू केला आहे, याची दखल सुद्धा घेतली जात नाही… विविध प्रकारच्या परवानग्या स्थानिक पातळीपासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत राजरोसपणे दिल्या जातात व रान मोकळे केले जाते… यामुळे शेतकऱ्यांच्या, स्थानिकांच्या व प्रकल्पग्रस्तांच्या माथी दारिद्र्य असून सर्वच क्षेत्रातील अधिकारी गुंगीचे औषध घेऊन कामे करत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे, याची दखल घेणे गरजेचे आहे… मात्र आजपर्यंत जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक रायगड यांच्या नेमणुका सत्ताधाऱ्यांनी करताना नेमका कोणता हेतू ठेवला होता? हे आजही गुलदस्त्यात आहे… तसेच जिल्हाधिकारी यांच्या अधिपत्याखाली असणारे व शासनाला महसूल देणारे विभाग नक्की कशा पद्धतीने महसूल गोळा करतात व कोणासाठी करतात हे जगजाहीर आहे… तरी रायगड जिल्ह्यासाठी सुद्धा सक्षम आयएएस दर्जाचे जिल्हाधिकारी तात्काळ नेमण्यात यावे ही लेखी मागणी बेकावडे यांनी केली आहे…
बेकावडे हे 35 वर्षे सामाजिक काम करत असताना अनेक वाईट अनुभव आले… त्यातच सत्ताधिकारी नको त्या कलावंतांना, गुंड, अवैध व्यवसायदार माफिया, कॉन्ट्रॅक्टर, दलाल यांना स्वार्थापोटी कोणत्याही क्षणी कोणत्याही वेळी भेटीगाठी देतात याची ज्वलंत उदाहरणे आपण पाहत असतो… मात्र सामाजिक कार्यकर्त्यांनी फक्त आंदोलने, उपोषणे व पत्रव्यवहार करून जनतेची कामे करावी हीच माननीय मुख्यमंत्री व मंत्र्यांची तसेच अधिकाऱ्यांची इच्छा असते का? ही बाब प्रामुख्याने लक्षात घेणे गरजेचे आहे असेही शेवटी सामाजिक कार्यकर्ते आणि बेकावडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले… त्यामुळेच रायगड जिल्ह्यासाठी नवीन आयएएस दर्जाचे जिल्हाधिकारी व आयपीएस दर्जाचे पोलीस अधीक्षक यांची तात्काळ नियुक्ती करा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते हरिष बेकावडे यांनी लेखी पत्राद्वारे केली आहे…