अलिबाग शिवसत्ता टाइम्स (धनंजय कवठेकर):-
अलिबाग तालुक्यातील सागरवाडी माची परिसरातील आदिवासी शेतकऱ्यांनी सरकारकडून सुरू असलेल्या जमिनीच्या मोजणीविरोधात तीव्र आक्रमक भूमिका घेतली आहे…या शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की,”आमच्या तीन पिढ्या या जमिनीवर शेती करत आहेत…ही जमीन आमची आहे, आम्हाला तिथून हटविण्याचा कुठलाही अधिकार सरकारला नाही.”
या संदर्भात संबंधित शेतकऱ्यांनी अलिबाग तहसील कार्यालयात निवेदन दिले असून, पोलीस अधीक्षक, रायगड यांच्याकडेही तक्रार दाखल केली आहे. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही, ही स्थानिक नागरिकांची मोठी नाराजी आहे.
शेतकऱ्यांनी सांगितले की, “ही जमीन आमच्या पूर्वजांपासून आमच्या मालकीची आहे. सरकारच्या मोजणीमुळे आम्हाला बेघर केले जात आहे. आदिवासी समाजावर अन्याय चालू आहे.” त्यांनी अट्रॉसिटी कायद्यान्वयेही तक्रार दाखल केली आहे, परंतु त्यावर कोणतेही उत्तर किंवा कारवाई अद्याप झालेली नाही, हे विशेष उल्लेखनीय आहे.
मोजणी बेकायदेशीर असल्याचा आरोप करत, आदिवासी शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की, “सरकारने आम्हाला न्याय द्यावा. आमच्या जमिनीचे संरक्षण करावे व आमचे पुनर्वसन न करता आमच्यावर अन्याय करू नये… या संदर्भात सरकारने तातडीने लक्ष घालून,तपासणी करून भूमिहीन होणाऱ्या आदिवासी शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी सामाजिक संघटना आणि स्थानिक कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे…