अलिबाग शिवसत्ता टाइम्स (धनंजय कवठेकर):-
अलिबाग वडखळ मार्गावर शनिवार दि.२४ मे रोजी सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जॅम झाल्याचे पाहायला मिळत आहे.महिन्याचा चौथा शनिवार,रविवार या सलग सुट्ट्यांमुळे मुंबई-पुण्याच्या पर्यटकांनी अलिबाग मुरुडकडे धाव घेतली आहे, तसेच दोन तीन दिवसांपासून लग्नसमारंभ मोठ्या प्रमाणात असल्याने लग्नासाठी जाणाऱ्या वऱ्हाडी मंडळींची मार्गावर गर्दी मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे…यामुळे लग्नाला जाणाऱ्या मंडळींची व पर्यटकांची गर्दी रस्त्यावर झाल्याने दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम झाले असल्याने इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी काही वाहनचालकांनी हलगर्जीपणा केल्यामुळे जागोजागी वाहतूक ठप्प झाली आहे.ट्रॅफिक जाम झाले असले तरी पेझारी नाका वगळता पोयनाडपासून धरमतरपर्यंत फक्त एकच वाहतूक पोलीस कर्मचारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी उपस्थित असल्याने वाहतूक व्यवस्था कोलमडून गेली आहे. आजारी रुग्णांना घेऊन जाणाऱ्या,रुग्णवाहिकेला मार्ग काढताना दमछाक होत असल्याचे दिसून येत आहे, काही मिनिटांच्या प्रवासाला दोन ते तीन तासांपेक्षा जास्त वेळ लागत असल्याने सगळ्यांनाच मनस्ताप सहन करावा लागतो आहे.