रायगड शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर ) :-
नुकतीच विधानसभेची निवडणूक पार पडली…निकालही लागून मुख्यमंत्र्यांच्या नावाची औपचारिकता बाकी राहिली आहे. त्यामुळे आता जिल्हा परिषद, पंचायत समिती, स्थानिक स्वराज्य संस्था तसेच नगर पालिका, महानगरपालिकांच्या निवडणुकीचे वेध लागले आहेत. या निवडणुकांची घोषणा कधी होणार या प्रतीक्षेत नागरिकांसह हवसेनवसे आहेत…विधानसभेची निवडणूक नुकतीच झाली असून आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका होणार असल्याच्या चर्चा रंगत आहेत. त्यामध्ये रायगड जिल्हा परिषद, पंचायत समिती यांची मुदत संपून साधारण दोन ते तीन वर्षे झाली आहेत. तसेच राज्यातील काही शहरांच्या नगरपालिका, मुंबई सारख्या देशाचा अर्थ व्यवहार सांभाळणारी महानगरपालिका तसेच विविध गावच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका रखडलेल्या असून त्याचा कारभार प्रशासना मार्फत होत आहे…त्यामुळे विकासाला हवी तशी गती मिळत नसून काही कामानिमित्त शासकीय कार्यालयात आलेल्या सर्वसामान्य नागरिकांचे प्रशासकीय अधिकाऱ्यांबरोबर थेट संपर्क व्हावा त्यासाठी लोकप्रतिनिधी असावा लागतो.सरकार व राज्य सरकार यांच्याकडून जो निधी गावांच्या किंवा शहरांच्या विकासासाठी येत असतो त्या निधीमधून जिल्हा परिषद अध्यक्ष, पंचायत समिती सभापती, नगराध्यक्ष, सरपंच यांच्यामार्फत शहरे व गावांचा पाणी, रस्ते, लाईट, स्वच्छता व काही समस्यांचे निराकरण तसेच विविध विकास कामे होत असतात. त्यामुळे अशा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका लवकर झाल्यास सर्वसामान्यांचा विकासाचा मार्ग मोकळा होऊन राज्यातील शहर, गावांचा थांबलेला विकास झपाट्याने नक्कीच होईल. त्यामुळे या सर्व निवडणुका लवकरात लवकर घेण्यात याव्यात, अशी मागणी गावा गावातून होत आहे. सदरील या सर्व निवडणुका 2025 च्या सुरूवातीच्या महीन्यात होतील असा तर्क वर्तवण्यात येत असून त्याची घोषणा कधी होणार या प्रतीक्षेत नागरिकांसह इच्छुक आहेत…