अलिबाग शिवसत्ता टाइम्स (ओमकार नागावकर):-
ईव्हीएमद्वारे निवडून आलेल्या महायुती सरकारचा अजब कारभार सध्या सुरु आहे…एखादी घटना घडल्यास थेट मंत्रालयातून पोलिसांवर कारवाई न करण्यासाठी दबाव येतो… अशीच एक घटना रेवदंड्यात नुकतीच घडली… त्याची ही कहाणी… घटना बाहेरून आलेल्या पर्यटकांनी स्थानिकांना केलेल्या मारहाणीची आहे… तर कहाणी अशी नाशिकवरुन आलेल्या पर्यटकांनी अलिबाग चौल-भाटगल्ली येथील स्थानिक वडील- मुलाला मारहाण केल्याची घटना सोमवार (दि.6)सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास घडली. अरुण घरत आणि सुयोग घरत अशी मारहाण झालेल्यांची नावे आहेत. त्यानंतर मोठा वादाचा प्रसंग याठिकाणी ओढावला होता.राजकीय वरदहस्त असलेल्या नाशिक पंचवटी येथील पर्यटकांकडून घटनास्थळी अरेरावीची भाषा करण्यात येत होती. हा वाद शेवटी रेवदंडा पोलीस ठाण्यात गेला. दरम्यान, या आरोपाचे रेवदंडा पोलिसांकडून खंडन करण्यात आले आहे. जवळपास दहा तासांनंतर रात्री उशिरा या घटनेत परस्परांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत हकीकत अशी की, चौल-भाटगल्ली येथे अरुण घरत यांचे सिमेंट व अन्य मटेरियल सप्लायर्सचे दुकान आहे. त्यांचा मुलगा सुयोग सकाळी साडेदहाच्या सुमारास चौल-सागमळा येथे सिमेंटच्या गोणी टेम्पोतून घेऊन जात होता. त्याचा टेम्पो सागमळा एस नाईक आळी येथे आला असता, रेवदंडा बाजूकडून अलिबाकडे जात असलेल्या मागून येणाऱ्या नाशिक पंचवटी येथील पर्यटकांच्या गाडीने टेम्पोला जोरदार ठोकर दिली. सदर गाडी दीपाली स्वप्नील वानखेडे या चालवत असल्याचा दावा सुयोग घरत याने केला आहे. गाडीतील महिला चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. यामध्ये त्यांच्या गाडीचे नुकसान झाले. स्वतःच्या चुकीने अपघात झाला असतानाही पर्यटक माझ्यावर अरेरावी करु लागले. गाडीत बसलेल्या अन्य लोकांनी मला मारहाण केली. मी तात्काळ वडील अरुण घरत यांना घटनास्थळी बोलावले. ते येताच पर्यटक महिला आणि पुरुषांनी काहीही ऐकून न घेता आम्हा दोघांना हाताबुक्क्यांनी जोरदार मारहाण केली, असा आरोपही सुयोग घरत याने केला आहे. या मारहाणीत अरुण घरत जखमी झाले असून, त्यांना तात्काळ रेवदंडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ दाखल करण्यात आले. या मारहाणीत वडिलांची सोन्याची चैन गहाळ झाल्याची माहिती सुयोगने दिली.
दरम्यान, हा अपघात घडल्यानंतर मोठ्या प्रमाणात सागमळा येथे वाहतूक कोंडी झाली होती. रेवंदडा पोलिसांना तात्काळ हस्तक्षेप करीत वाहतूक सुरळीत केली. त्यानंतर दोन्ही गटातील लोकांना पोलीस ठाण्यात हजर केले. पर्यटकांना राजकीय वरदहस्त असल्याने त्यांच्यासाठी मंत्रालयातून फोन करुन पोलिसांवर दबाव टाकण्यात आल्याने पोलीस गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करीत होते, असा आरोप घरत वडील मुला करून करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे दुपारी बाराच्या दरम्यान घटना घडल्यानंतर पोलीस ठाण्यात जवळपास रात्री दहा वाजताच्या दरम्यान गुन्हा दाखल करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यानच्या काळात पोलिसांकडून घरत आणि त्यांच्यासोबत असलेल्या इतर व्यक्तींना अरेरावीची भाषा वापरुन पर्यटकांना गोंजारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही करण्यात येत आहे. परंतु, पोलिसांनी हे सर्व आरोप फेटाळले असून, दोन्ही बाजूच्या लोकांना परस्परात सामंजस्याने वाद मिटवण्याचे आवाहन केल्याचे म्हटले आहे. पोलिसांकडून सामान्य आरोपींना अशी वागणूक कधी दिली जाते का? फक्त बघ्याची भूमिका घेणाऱ्या रेवदंडा पोलिसांच्या कार्यप्रणालीवर संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान, या घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत किरवले यांच्या मार्गदशर्नाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल महेंद्र राठोड करीत आहेत…साडेअकाराच्या सुमारास झालेल्या अपघाताबाबत गुन्हा दाखल करण्यास जवळपास दहा तास का लागले, याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. आरोपींना राजकीय वरदहस्त असल्याने मंत्रालयातून त्यांच्यासाठी पोलिसांना फोन येत होते, अशी चर्चा पोलीस ठाण्याच्या परिसरात रंगली होती.