रोहा शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-
रायगड जिल्ह्यात पंधरा दिवसात दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार करण्याचा प्रसंग घडला असून रोहा घटनेतील आरोपी तेजस पडवळ याच्यावर वरसे येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचारासहित अजून तीन गुन्हे दाखल झाले आहेत.अल्पवयीन अत्याचार करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याची स्थिती आहे. रायगड जिल्ह्यातील रोहा व मुरुड तालुक्यामधील एका गावात सात वर्षीय मुलीवर अतिप्रसंग झाल्याची घटना घडली आहे.मागील वर्षांत जिल्ह्यात अल्पवयीन मुलींवर व महिलांवरील अत्याचार , विनयभंग अशा साडे तीनशेहुन अधिक घटना घडल्या असल्याचे पोलीस विभागाकडून देण्यात आलेल्या आकडेवारीवरून समोर आले आहे. कायदे कडक होत असले तरी हे प्रमाण नक्कीच सामाजिक दृष्टीने चिंतेचे कारण म्हणावे लागेल.
नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच माणुसकी आणि नात्याला काळिमा फासणारी घटना रोहा तालुक्यातील वरसे गावात नुकतीच घडली होती. आरोपी तेजस पडवळ याने आपल्याच गावातील व नात्यातील ११ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार पीडित मुलीने आपल्या घरातील लोकांना सांगितला. त्यानंतर येथील वातावरण तंग झाले होते.
या घटनेतील मुख्य आरोपी तेजस पडवळ याच्या विरोधात रोहा पोलीस ठाण्यात पोक्सो कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला बेड्या ठोकण्यात आल्या. या घटनेतील ३ आरोपींना रोहा न्यायालयासमोर हजर करताच त्याला न्यायालयाने १३ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. सहा दिवसाची कोठडी पूर्ण होण्याआधीच तेजस पडवळ या नराधमाने आणखी महिलाच्या बाबत केलेले कारनामे बाहेर पडले आहेत. या आधी तेजस्ने केलेले अत्याचार सहन करणाऱ्या महिलानी धाडस दाखवून थेट पोलीस ठाणे गाठले. त्यानंतर या आरोपी विरोधात पोक्सो आणि महिलांचे विनयभंग केल्याची तक्रार पीडितांनी दिली.
एकाच पोलीस ठाण्यात एकाच आठवड्यात २ पोक्सो आणि २ महिलांचे विनयभंग केल्याचे संतापजनक आणि तितकेच गंभीर गुन्हे एकाच आरोपीच्या विरोधात दाखल करण्यात आले असल्याची रायगड जिल्ह्यात पहिलीच घटना ठरली आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या महीला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांच्या मतदारसंघात ही घटना घडली आहे…या घटनेनंतर गावातील महिला व मुलींची छेड काढणाऱ्या या बाहेरख्याली आरोपीचे जणूकाही ग्रह फिरले आहेत. त्याचे एक-एक कारनामे बाहेर पडत असल्याने सारेजण आश्चर्यचकित झाले आहेत…आरोपी तेजस पडवळ याने वरसे गावांतील एका अल्पवयीन मुलीला तिच्या मोबाईल वरील इन्स्टाग्राम व स्नॅपचॅटद्वारे घाणेरडे मेसेज पाठवून छुपा पाठलाग केला होता. तसेच आरोपी तेजसच्या घराशेजारी सार्वजनिक नळावर सदर मुलगी पाणी भरण्यासाठी जात असताना तिच्याकडे वाकड्या नजरेने पाहून तिचा विनयभंग केला. सदर घटना मे २०२४ रोजी घडली होती. मात्र आरोपी तेजसने ३० डिसेंबर रोजी आपल्याच नात्यातील आणखी एका अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग केल्याची धक्कादायक बाब उघड झाल्यानंतर दुसऱ्या पीडित अल्पवयीन मुलीने व घरातील मंडळीने पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपी तेजसची कर्मकहाणी पोलिसांना सांगितली. पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून आरोपी तेजस विरोधात आणखी एक पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्याचप्रमाणे मार्च २०२४ मध्ये आपल्याच गावातील एका तरुणी जवळ वैयक्तिक परिचय वाढविण्यासाठी तरुणीच्या मित्राकडे मोबाईल नंबर मागितला. मात्र सदर तरुणीने मोबाईल नंबर देण्यास नकार दिला. असे असताना सदर तरुणी गावातील सार्वजनिक ठिकाणी आरोपी व्यक्तीच्या घराजवळ असलेल्या नळावर पाणी भरण्यासाठी जात असताना आरोपी तेजस पडवळ याने घरातील खिडकीत उभा राहून त्या तरुणीकडे पाहून वेळोवेळी अश्लील इशारे केले…विशेष म्हणजे ही तरुणी पोलीस भरतीत प्रशिक्षण घेत असल्याने ती ३० जुलै२०२४ रोजी मुंबईत पोलीस भरती प्रक्रियेसाठी जाणार होती. या गोष्टीची माहिती समजताच लंपट तरुणाने त्या तरुणीला फोन करून तू मुंबईत पोलीस भरती करीता जाणार आहेस. तेव्हा आपण दोघे सोबत जाऊ असे बोलत असताना सदर तरुणीने फोन कट केला. या घटनेच्या अनुषंगाने तरुणीचा विनयभंग झाल्याने सदर तरुणीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली… त्याचप्रमाणे त्याच गावातील एका महिलेकडे मोबाईल नंबर मिळविण्याकरिता तिच्या घराच्या उंबरठ्यावर जाऊन तीच्याकडे वाईट नजरने बघून डोळ्याने इशारा करून मला तुझं मोबाईल नंबर दे असे बोलून वेळोवेळी तिचा पाठलाग करून जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. सदर घटना १५ डिसेंबर २०२३ रोजी घडली होती. मात्र आरोपी तेजस पडवळ याच्या दहशतीला घाबरून या महिलेने तक्रार दिली नाही. असे असताना काही दिवसापूर्वी या आंबट शौकीन तरुणा विरोधात एका अल्पवयीन मुलीने अत्याचाराची तक्रार दिल्याने सदर महिलेला धीर आल्याने या आंबट शौकीन तरुणाला अद्दल घडविण्यासाठी व महिला तरुणी व अल्पवयीन मुलींवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी धाडस दाखवून या महिलेने पोलीस ठाणे गाठून आपली फिर्याद नोंदविली आहे. एकंदरीत आरोपी तेजस पडवळ याच्या विरोधात आठ दिवसात ४ गंभीर प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या घटनेनंतर संतप्त रोहेकर नागरिकांनी मूक मोर्चा काढून निषेध व्यक्त केला व या आंबटशौकीन तरुणाला भर चौकात फाशी देण्याची मागणी केली आहे. रयतेच्या स्वराज्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना कायद्याची जरब बसवली. स्त्रियांकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांचे डोळे काढले जात. हात-पाय तोडले जात. कडेलोट केला जायचा.कायद्याची ही भीती इतकी होती की, महिलांना त्रास देण्याचे धाडस कुणी करत नसे. आजच्या महाराष्ट्रातील महिलांची असुरक्षितता पाहता पुन्हा शिवकाळातील कठोर शिक्षा सुनावण्याची वेळ आली आहे. महिलांच्या सुरक्षिततेवर भले मोठे प्रश्नचिन्ह उभे असताना आता किती दिवस फक्त मेणबत्ती जाळायची? नराधमांना जरब कधी बसणार? महिलांवरील लैंगिक अत्याचाराच्या वाढत्या घटनांनी समाजमनाचा उद्वेग असा टिपेला पोहोचला आहे. दिवसाढवळ्या मुलींवर बलात्कार होतो. लैंगिक शोषण होते. बलात्कारानंतर खून केला जातो.महिलांवर होणारे अत्याचार, विनयभंग, छेडछाड अशा निषेधार्ह घटनांचे प्रमाण संपूर्ण समाज गावगुंडाच्या पातळीवर येऊन पोहोचला असावा अशी शंका येण्याइतपत वाढले आहेत. त्यांना आळा घालण्यासाठी आहेत ते कायदेही अपुरे वाटू लागले आहेत. केवळ सार्वजनिक ठिकाणी महिला पोलिस तैनात करून या गावगुंडांना धाक बसणार नाही. अत्यंत कठोर कायदा आणि अजामीनपात्र गुन्हा यामुळेच अशा वासनांधांना जरब बसू शकेल. मुख्य म्हणजे स्त्रियांनी, ज्यांना आमचे जुने लोक ‘अबला’ म्हणतात, त्यांनीच आता ‘सबला’ होऊन अशा गावगुंडांना धडा शिकवणेही तितकेच गरजेचे आहे….