रोहा शिवसत्ता टाइम्स (अक्षय जाधव):-
वारकरी संप्रदायाच्या कार्यक्रमात शिवसेनेचे नेते महेंद्र थोरवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांच्यावर नाव न घेता जोरदार टीका केली…”बेईमान बादशाह” असा उल्लेख करत त्यांनी तटकरे यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधत त्यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.थोरवे म्हणाले, “या मतदारसंघात चुकीची माणसं जन्माला आली आहेत, ज्यांनी संपूर्ण संस्कृती खराब करण्याचे काम केले आहे. वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेवर चालणाऱ्या शिवसेनेला असे कधीही मान्य होणार नाही. तुमच्याकडेही एक ‘बेईमान बादशाह’ आहे, ज्याचा हिशेब चुकता केल्याशिवाय शिवसेना स्वस्थ बसणार नाही… त्यांनी पुढे सांगितले की, “या प्रदेशात संस्कृती आणि धर्मकार्य जपणे अत्यंत महत्त्वाचे आहे. वारकरी संप्रदाय ही आपल्या संस्कृतीचा आत्मा आहे आणि आम्ही कोणालाही ती नष्ट करू देणार नाही. तुमचं धर्मकार्य सुरू ठेवा, येवल्याचा नाश करण्याचे काम आम्ही करू.कार्यक्रमात उपस्थित असलेल्या वारकऱ्यांनी थोरवे यांच्या या आक्रमक भाषणाला जोरदार प्रतिसाद दिला. त्यांच्या भाषणातून आगामी निवडणुकांच्या दृष्टीने शिवसेनेची रणनीती स्पष्ट झाली. विरोधकांवर थेट टीका करत त्यांनी मतदारसंघातील जनतेला आपल्या बाजूने उभे राहण्याचे आवाहन केले. या भाषणामुळे रायगडच्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. “बेईमान बादशाह” असा उल्लेख करताना थोरवे यांनी कोणाचा उल्लेख केला हे जरी त्यांनी स्पष्ट केले नसले, तरी राजकीय वर्तुळात हे वक्तव्य तटकरे यांच्यावरच होते, असे बोलले जात आहे. महेंद्र थोरवे यांनी शिवसेना कार्यकर्त्यांना एकजूट राहण्याचे आवाहन करत सांगितले की, “संस्कृती टिकवण्याचे काम प्रत्येक शिवसैनिकाचे कर्तव्य आहे. वंदनीय बाळासाहेबांच्या विचारधारेवर चालत आम्ही कोणत्याही अन्यायाविरोधात लढत राहू… या टीकेमुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रायगड मतदारसंघातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे. रोह्यातील हा कार्यक्रम वारकरी संप्रदायासाठी आयोजित करण्यात आला असला, तरी त्याचा राजकीय रंग स्पष्टपणे दिसून आला…