मुंबई शिवसत्ता टाइम्स (देवेंद्र मोरे):-
भारतात गणेश ही लोकप्रिय देवता असून गणेशाच्या पूजेशिवाय कुठल्याही शुभ कार्याला सुरुवात होत नाही. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत गणेश हा आपल्यातलाच वाटतो. भारतात भाद्रपद महिन्यातील गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. यंदा गणेशोत्सव 27 ऑगस्टला असणार आहे. यापूर्वी महाराष्ट्रात माघ महिन्यातही गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. हो, वैदिक हिंदू दिनदर्शिकेनुसार,गणेश जयंती दरवर्षी माघ शुद्ध चतुर्थीला साजरी करण्यात येते…याला विनायक चतुर्थी तसंच वरद चतुर्थी असेही म्हटलं जातं…गणपती बाप्पांच्या जन्म या माघ शुद्ध चतुर्थीला झाला अशी पौराणिक मान्यता आहे.म्हणून या माघी चतुर्थीला विशेष महत्त्व आहे.हिंदू धर्मशास्त्राच्या मान्यतेनुसार, कोणत्याही शुभकार्याचा आरंभ गणपतीच्या पुजनाने,आशिर्वादाने केला जातो…लग्न,मुंज,नूतन वास्तु प्रवेश असो की एखाद्या कार्यालयाचे, व्यावसायिक आस्थापनाचे उद्घाटन असो, सुरुवात गणेशाच्या पुजनानेच केली जाते.पौराणिक कथेच्या आधारे स्वयं शिवशंभू म्हणजे महादेव, गणपतीचे पिताश्री यांनीच सर्वप्रथम अग्रपूजेचा मान गणपतीला असेल असे गणेश जन्माच्या वेळी सांगितल्याप्रमाणे हिंदू धर्मात तशी प्रथा रूढ आहे. पेशवेकाळात तर गणपती, गणेशपूजन, गणेशमंदिरे यांना राजाश्रय प्राप्त झाला. एकंदरीत भारतीय संस्कृतीत गणेशाला अनन्यसाधारण महत्त्व आहे, आणि महाराष्ट्रात गणपती उत्सव म्हटला की विशेष महत्व आहे मग भाद्रपदातील गौरी-गणपती असो किंवा माघी गणेशोत्सव, सर्वत्र कमालीचे उत्सवाचे उत्साही वातावरण असते. महाराष्ट्रातील अष्टविनायक क्षेत्रं सर्वश्रुत आहेत नव्हे गणेशभक्तांची पंढरीच आहे. याशिवाय मुंबई येथील श्री सिद्धिविनायक, कोंकणातील दापोली तालुक्यातील आंजर्ले येथील कड्यावरचा गणपती, गुहागर तालुक्यातील हेदवी येथील दशभुजा गणेश, रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे, श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर येथील सुवर्ण-गणेश अशी गणपतीची अनेक क्षेत्र सुप्रसिद्ध आहेत. तसेच ठाणे जिल्ह्यातील टिटवाळा येथील गणपती मंदिर हे पेशवेकालीन असून माधवराव पेशवे यांनी या मंदिराचा जिर्णोद्धार केला आहे.या सर्वच ठिकाणी माघी गणेश चतुर्थीला मोठा उत्सव असतो. येथील परिसर “गणपती बाप्पा मोरया” या गणपती बाप्पांच्या निनादाने घुमत असतो. सगळीकडेच सात्विक, उत्सवी उत्साहाचे वातावरण अनुभवास येते.अगदी थेट मराठी म्हणजे विशेषतः पेशवेकालीन मराठी साम्राज्यापासून गणपती आणि महाराष्ट्र हे एक भारतातील वेगळेच समिकरण आहे. स्वातंत्र्याच्या पुर्वार्धात लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाचा पाया घालत सांस्कृतिक कार्यक्रमातून लोकमानसात स्वातंत्र्याचे बीजारोपण केले.हा सार्वजनिक गणेशोत्सवाचा वेलू महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फोफावल्याचे आपल्याला ठाऊकच आहे. पण ह्या उत्सवातील पावसाच्या आक्रमणास पर्याय म्हणून १९७० साला पासून सार्वजनिक माघी गणेशोत्सवाचे वारे वाहू लागले आणि आता तर मुंबई पासून महाराष्ट्रभर सर्वत्र याचे लोण पसरले आहे अगदी कोंकणही अपवाद नाही. एवढेच काय हल्ली लोक घरोघरी देखील भाद्रपद महिन्यातील गणेशोत्सवाप्रमाणे शाडूच्या मातीच्या गणेशमुर्तीची प्राणप्रतिष्ठा करून साजरा करू लागलेत.आता आपण या माघी गणपतीच्या पुजा विधी व भक्ती साधना, त्यांचे औचित्य व पुण्य विशेष काय आहे पाहुया… गणपतीच्या पुजा विधीचा आणखी काही आगळा वेगळा प्रकार नाही, तर अगदी भाद्रपद चतुर्थीला जशी श्रींची प्राणप्रतिष्ठा व पूजा अर्चा केली जाते तशीच पण एक लक्षात घ्यावे की माघी गणेश चतुर्थी ही तिलकुंद चतुर्थी म्हणून साजरी करण्याचा प्रघात आहे.अग्नी पुराणात मोक्षप्राप्तीसाठी या तिलकुंद चतुर्थी व्रताचे महत्त्व सांगण्यात आले आहे.माघी चतुर्थीला पुजेचा वेगळा प्रकार नसला तरी प्रसाद म्हणून यावेळी उकडीच्या मोदकांपेक्षा तिळगुळ किंवा तिळाच्या लाडवांचा नैवेद्य, प्रसादात अग्रमान्य आहे…