राजकीय सत्तासंघर्षामुळे रायगड जिल्ह्याचे मोठे नुकसान… पालकमंत्रीपदाच्या वादामुळे रायगडच्या सामान्य जनतेला फटका…

0
31

रायगड शिवसत्ता टाइम्स (धनश्री रेवडेकर):- 

रायगड जिल्ह्यातील पालकमंत्रीपदावरून सुरू असलेला राजकीय संघर्ष काही थांबायचे नाव घेत नाही. कोणत्या नेत्याकडे पालकमंत्रीपद जाईल, कोणता पक्ष वर्चस्व राखेल, यावरून भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यात तणाव वाढत चालला आहे…मात्र, या सत्तासंघर्षात खरा फटका बसत आहे तो रायगडच्या सामान्य जनतेला…प्रशासनात अनागोंदी स्थिती निर्माण झाली असून,अनेक विकास प्रकल्प रखडले आहेत…  रायगड हा ऐतिहासिक आणि औद्योगिक दृष्ट्या महत्त्वाचा जिल्हा आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला लागून असलेल्या या जिल्ह्यात अनेक औद्योगिक प्रकल्प, बंदरे, पर्यटनस्थळे आणि कृषी व्यवसाय मोठ्या प्रमाणावर आहेत…अशा परिस्थितीत एक सक्षम पालकमंत्री असणे गरजेचे आहे…मात्र, राजकीय सत्ता-संघर्षामुळे हे पद अद्याप रिक्त असल्याने जिल्ह्यातील महत्त्वाचे निर्णय प्रलंबित राहिले आहेत.

राजकीय गोंधळामुळे जिल्ह्यातील स्थानिक प्रशासनावर मोठा परिणाम झाला आहे… मोठ्या प्रमाणावर निधी मंजुरीच्या फाईली रखडल्या आहेत, विकासकामे थांबली आहेत आणि महत्त्वाचे निर्णय घेतले जात नाहीत. ग्रामीण भागातील रस्त्यांची दुर्दशा सुरूच आहे, रोजगार निर्मितीच्या संधींवर मर्यादा येत आहेत आणि नागरिकांच्या मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष होत आहे…सामान्य जनता आधीच महागाई, बेरोजगारी आणि मूलभूत सुविधांच्या अभावामुळे त्रस्त आहे… अशातच पालकमंत्री नसल्याने जिल्ह्याच्या समस्या अधिकच बिकट होत आहेत…शेतकऱ्यांना कर्जमाफी, पिक-विमा, सिंचन प्रकल्प आदी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी अधिकाऱ्यांकडे हेलपाटे मारावे लागत आहेत. शिक्षण, आरोग्य आणि पायाभूत सुविधा या क्षेत्रांमध्येही विकास ठप्प झालेला आहे…

याशिवाय, रायगडमध्ये मोठ्या प्रमाणावर पर्यटन व्यवसाय चालतो…अलिबाग, मुरुड, हरिहरेश्वर, किल्ले रायगड यांसारख्या ठिकाणांना भेट देण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक येतात. मात्र, योग्य नियोजनाअभावी आणि पालकमंत्र्याच्या अभावामुळे पर्यटन क्षेत्राच्या विकासाला गती मिळत नाही. हा वाद केवळ सत्तेसाठी आणि राजकीय स्वार्थासाठी सुरू असल्याचे स्पष्ट आहे. जर या नेत्यांना खरोखरच रायगडच्या जनतेची चिंता असेल,तर त्यांनी तातडीने तोडगा काढून एक सक्षम पालकमंत्री नेमावा. हा जिल्हा ऐतिहासिक दृष्ट्या छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ला लाभलेला आहे… इथला प्रत्येक नागरिक महाराजांच्या विचारांना मानणारा आहे… मात्र, सध्याच्या नेत्यांकडून जनतेच्या अपेक्षांना हरताळ फासला जात आहे…

रायगड जिल्ह्याला एका ठोस आणि कणखर नेतृत्वाची आवश्यकता आहे… राजकीय पक्षांनी एकमेकांवर कुरघोडी करण्याऐवजी जिल्ह्याच्या विकासावर भर द्यावा… पालकमंत्री पदावरून सुरू असलेली रस्सीखेच थांबवून तांतडीने निर्णय घेणे आवश्यक आहे. अन्यथा, जनता हे विसरणार नाही की, कोणी त्यांच्या हितासाठी काम केले आणि कोणी केवळ सत्तेचा खेळ खेळला… आगामी काळात हा असंतोष मतपेटीतून व्यक्त झाल्यास नेत्यांनी आश्चर्यचकित होऊ नये…