रायगड शिवसत्ता टाइम्स (अमुलकुमार जैन):-
कर्जत पोलीस ठाण्यात दि.२० फेब्रुवारी रोजी शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीची मोजणी झाल्याशिवाय कल्पतरू कंपनीने कंपाउंड वॉलचे बांधकाम करू नये, या मागणीसाठी भाजप नेते व माजी आमदार सुरेश लाड यांनी पोलिस स्टेशनच्या पायरीवरच झोपून आमरण उपोषण सुरू केले होते… रात्री उशिरा प्रांत अधिकारी वैभव संकपाळ यांच्या उपस्थितीत उपोषण स्थगित करण्यात आले.पळसदरी येथील कल्पतरू प्रकल्पात अपंग शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोपही सुरेश लाड यांनी केला आहे. त्यांनी मागणी केली आहे की, कल्पतरू कंपनीने ज्या जमिनी ताब्यात घेतल्या, त्याची सीमाबंदी करताना मोजणी करावी. तसेच, शेतकऱ्यांना वेळ द्यावी आणि अतिक्रमण थांबवावे. विशेषतः पांडुरंग शिर्के (मुक्काम वर्णे) या शेतकऱ्यावर अन्याय होत असल्याचा मुद्दा लाड यांनी उपस्थित केला आहे.
या आंदोलनात सुरेश लाड यांनी कर्जत पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुरेंद्र गरड यांच्या मनमानी कारभारावरही टीका केली. त्यांनी विविध प्रकरणांमध्ये अधिकारांचा गैरवापर केल्याचा आरोप केला आहे. भात खरेदी प्रक्रियेत आदिवासी शेतकऱ्यांची लूट कुणी केली? मुस्लिम कब्रस्तानमध्ये पुरलेला मृतदेह खून होता का? युसूफ खान याच्यावर वयक्तिक राग मनात धरून केलेली कारवाई-यासारख्या मुद्द्यांकडेही सुरेश लाड यांनी लक्ष वेधले.दिवसभर कर्जत पोलिस ठाण्यात एकच खळबळ उडालेली पाहायला मिळाली. कर्जतमध्ये अनेक सामाजिक मान्यवर तसेच भाजपची संपूर्ण टीम यानिमित्ताने रस्त्यावर उतरलेली दिसली. दरम्यान, रायगड जिल्हा अप्पर पोलिस अधीक्षक अभिजीत शिवथरे यांची मध्यस्थी यशस्वी न ठरल्याने रात्री उशिरा शिवथरे यांनी कर्जत पोलिस ठाण्यातून आपला मुक्काम सोडला.
रात्री उशिरा कर्जत-खालापूरचे प्रांताधिकारी यांनी या संदर्भात मध्यस्थी करून एक पत्र जारी केले. या पत्रात त्यांनी स्पष्ट केले की, जिल्हाधिकारी, अधीक्षक भू अभिलेख रायगड आणि कंपनी प्रशासनातील संपर्क अधिकारी श्री. चोरगे यांच्यासोबत चर्चा झाली आहे. त्यानुसार, शेतकऱ्यांनी तत्काळ भू अभिलेख खात्याकडे मोजणीसाठी अर्ज करावा व दोन दिवसांत मोजणी शुल्क भरावे. त्यानंतर विशेष बाब म्हणून संबंधित जमिनीची मोजणी तातडीने करण्यात येईल. मोजणी पूर्ण होईपर्यंत कंपनीला संबंधित शेतकऱ्यांच्या जमिनीवर कंपाउंड वॉलचे बांधकाम न करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या असून, याबाबत पोलीस प्रशासनालाही निर्देश देण्यात आले आहेत. असे लेखी आश्वासन प्रांत अधिकाऱ्यांनी दिले आहे.रात्री उशिरा १ वाजता माजी आमदार सुरेश लाड यांनी आपले उपोषण सोडले. यावेळी भाजप पदाधिकारी, समर्थक, सामाजिक कार्यकर्ते आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान,कर्जत पोलिस ठाण्यात एकही अधिकारी फार काळ टिकत नाही.अधिकाऱ्यांना काम करताना नक्की कुणाचा दबाव असतो.तसेच कर्जत पोलिस ठाण्याकडून नागरिकांना मिळणाऱ्या वागणुकीकडे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे लक्ष देतील का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.