स्वारगेटच्या घटनेनंतरही रोहा बसस्थानक असुरक्षित… रोहा आगार व्यवस्थापन कधी जागे होणार?…

0
26

रोहा शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-

पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात नुकताच एक धक्कादायक प्रकार घडला असून,सुरक्षेच्या अभावामुळे एका महिलेवर हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे प्रवासी सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मात्र, अशा घटनांतून धडा घेऊन रोहा आगार व्यवस्थापन काही पावले उचलणार का, हा महत्त्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

रोहा बस स्थानकात असुरक्षिततेचे प्रमाण वाढत असून, अनधिकृत दलाल, एजंट आणि भिकाऱ्यांचा सुळसुळाट झाला आहे. प्रवाशांना त्रास देण्याचे प्रकार वाढले असून, बस स्थानकात अस्वच्छता, दुर्गंधी आणि पाण्याच्या अपुऱ्या सुविधा यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. विशेषतः, संशयास्पद महिलांचा बसस्थानक परिसरात संचार वाढल्याने सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर झाला आहे.

या पार्श्वभूमीवर रोहा आगार व्यवस्थापनाने त्वरित पुढील उपाययोजना करणे आवश्यक आहे:
– दलाल व एजंटांवर कारवाई करून पोलिसांच्या मदतीने अनधिकृत व्यक्तींना हाकलून लावणे.
– सुरक्षा यंत्रणा बळकट करणे जसे की सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या वाढवून नियंत्रण ठेवणे.
– संशयास्पद व्यक्तींवर लक्ष ठेवणे म्हणजेच स्थानक परिसरात गस्त वाढवणे.
– प्रवाशांसाठी हेल्पडेस्क सुरू करणे व तक्रारी नोंदवण्यासाठी सोयीसुविधा उपलब्ध करणे.

स्वारगेटच्या घटनेनंतरही जर योग्य ती पावले उचलली नाहीत, तर भविष्यात गंभीर घटनांची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रोहा आगार प्रशासनाने तत्काळ कारवाई करून प्रवाशांची सुरक्षितता सुनिश्चित करावी.