स्वच्छ, सुंदर खोपोली जळी स्थळी पाण्याची डबकी… इमारतीचे सांडपाणी रस्त्यांवर आणि मोकळ्या जागेत…

0
38

खोपोली शिवसत्ता टाइम्स (खलील सुर्वे):- 

स्वच्छ भारत अभियानात खोपोलीला ‘स्वच्छ, सुंदर, निर्मळ’ शहर असल्याचा पुरस्कार दरवर्षी मिळत असतो.खोपोली नगरपरिषद प्रशासनाकडून शहराच्या स्वच्छतेचे…सुंदरतेचे ढोल बडविले जातात, परंतु खरंच खोपोली शहर स्वच्छ, सुंदर आहे का?असा प्रश्न निर्माण झाला आहे.

खोपोली नगरपरिषद हद्दीतील डिपी रोड,उदय विहार,चिंचवली शेकीन,लौजी आदी भागात उभारण्यात आलेले गृहप्रकल्प सांडपाण्याची खरंच व्यवस्था करीत आहेत का? आज या भागात रस्त्यांवर…शेतात, मोकळ्या प्लॉट, जळी स्थळी पाण्याची डबकी साचल्या असल्याचे दिसून येत आहे. ऐवढेच नव्हे तर काही ठिकाणी तर अस्वच्छ सांडपाणी सरळ सरळ पातळगंगा नदीत सोडण्यात आले आहे. सांडपाण्याचे व्यवस्थापन करण्यात अपयशी ठरलेली खोपोली नगर परिषद स्वच्छ भारत अभियानात पुरस्कार मिळवतेच कशी?असा प्रश्न उपस्थित होत आहे.

नवीन गृहप्रकल्प…निवासी संकुल…बंगला, फॉर्म हाऊस यांना पूर्णत्वाचा दाखला देतांना खोपोली नगर परिषदेचे नगर रचना विभाग या सर्व गोष्टी तपासत नाही का? बिगरशेती (एनए) करतांना अथवा बांधकाम करतांना ज्या नियम, अटी, शर्थी आहेत, त्यात सांडपाण्याचे व्यवस्थापन हा देखील महत्वाचा आहे. सांडपाणी व्यवस्थापन योग्य रितीने झाले असेल तरच पूर्णत्वाचा दाखला (ओसी) दिली जावू शकते. परंतु खोपोली नगर परिषदेचे सहायक नगर रचनाकार व रचना सहायक यांना या गोष्टींचे देणे-घेणे नसल्याचे दिसून येत आहे. बिल्डर इमारतींचे सांडपाणी बिनधास्त, राजरोस, बेजबाबदारपणे वाटेल तिथे सोडून देत असतांना बिल्डरला पूर्णत्वाचा दाखला (ओसी) दिला जात आहे. ऐवढेच नव्हे तर सांडपाणी व्यवस्थापनाबाबत कार्रवाई करण्यापेक्षा बिल्डरची बाजू तक्रारदार व पत्रकार यांच्याकडे खोपोली नगर परिषदेचे अधिकारी मांडत असतात. त्याचप्रमाणे बांधकाम विभागावर सांडपाणी रस्त्यांवर वाहण्याचे खापर फोडले जात आहे.

तक्रारी करूनही सांडपाण्याबाबत नगर परिषद प्रशासन कार्रवाई का करीत नाही ? असा प्रश्न पत्रकारांनी सहायक नगर रचनाकार साहिल गाढवे यांना विचारला असता शहरात भुयारी गटार नसल्याने बिल्डर हतबल ठरत आहेत. तसेच बांधकाम विभागाने गटारी न बांधल्याने बिल्डर तरी काय करणार असे त्यांनी सांगितले. तर दुसरीकडे बांधकाम विभागाचे अभियंता अनिल वाणी यांनी सांगितले की, गटार नसेल तर जिथपर्यंत सांडपाणी वाहून नेणारी व्यवस्था आहे, तिथपर्यंत पाणी सोडण्याची जबाबदारी बिल्डरची आहे. ऐवढेच नव्हे तर पूर्णत्वाचा दाखला देतांना या गोष्टी बघण्यात आल्या पाहिजेत. परंतु विकास निधीच्या नावाखाली नियम, अटी, शर्थी पूर्तताची पाहणी न करता नगर परिषद प्रशासन पूर्णत्वाचा दाखला देत असल्याचे दिसून येत आहे. नियमांची अमंलबजावणी होत नसल्याने बिल्डर निडर झाले असून बिनधास्त सांडपाणी कुठेही सोडून देत आहेत. त्याचप्रमाणे रस्त्यांवर देखील बिनधास्त बांधकाम करीत असल्याचे दिसून येत आहे. आपली जबाबदारी पार न पाडणाऱ्या खोपोली नगर परिषदेचे सहायक नगर रचनाकार व रचना सहायक यांच्यावर खोपोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉं. पंकज पाटील कार्रवाई करणार का ? असा प्रश्न नागरीकांमधून उपस्थित होत आहे.