रोहा शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-
रोहा तालुक्यातील गोफण गावातील शेतकरी सध्या प्रशासन आणि जेएसडब्लू साळाव कंपनीच्या दबावामुळे मोठ्या संकटात सापडले आहेत. शेतकऱ्यांच्या जमिनींवर कोणतेही कायदेशीर मालकी हक्क नसतानाही रस्ते व बांधकाम विभाग आणि कंपनीच्या अधिकार्यांनी त्यांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे.
स्थानिक शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या जमिनी आजही त्यांच्या नावावर असून, सातबारा उताऱ्यावर रस्ते व बांधकाम विभागाचा कोणताही उल्लेख नाही. मात्र, पैसे आणि प्रशासनाच्या मदतीने कंपनीने बळजबरीने या जमिनींवर आपली मालकी प्रस्थापित करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
या परिस्थितीला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांचा आवाज दडपण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी अनेक वेळा आपल्या हक्कासाठी लढा दिला असला, तरी प्रशासनाने त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप आहे.
आमची जमीन कोणत्या अधिकाराने घेतली आहे ? आम्हाला आमच्या शेतजमिनीपासून वंचित करण्याचा हा डाव आहे,असे एका शेतकऱ्याने भावनिक आवाहन केले.ही घटना कृषिप्रधान भारताच्या भविष्यासाठी गंभीर चिंता निर्माण करणारी आहे…शेतकऱ्यांची जमीन वाचवण्यासाठी कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने, आता त्यांच्यासमोर मोठे संकट उभे राहिले आहे…
या अन्यायाविरोधात प्रशासन काही कारवाई करणार का, की पैसे आणि दबावाच्या जोरावर शेतकऱ्यांना त्यांच्या हक्कांपासून वंचित केले जाणार,हा प्रश्न आता सर्वांसमोर आहे.