नव्या नवरीसारखा सजला मुंबई-पुणे महामार्ग… कर्मचाऱ्यांना सिक्युरीटी साहित्य देण्याकडे दुर्लक्ष…

0
21

खोपोली शिवसत्ता टाइम्स (खलील सुर्वे):- 

जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गांवर खालापूर फाटा ते खोपोलीपर्यंत रस्त्यावर वेग नियंत्रणासाठी व अपघात रोखण्यासाठी ठिकठिकाणी पिवळ्या रंगाचे पट्टे मारण्यात आले आहेत. नव्या नवरीप्रमाणे खोपोली शहरातून जाणाऱ्या रस्त्याला सजविण्यात येत आहे. पण हे सर्व करतांना कामगारांची सुरक्षा मात्र वाऱ्यावर असल्याचे दिसून येत आहे. पायात चप्पल, फाटके कपडे…हातात हॅंडग्लोज नाही, सिक्युरिटी जॅंकेट नाही, सिक्युरिटी शूज नाही, डोक्यात हेल्मेट नाही…अशी राम भरोसे काम करून घेणारा ठेकेदार, संस्था असतांना संबंधित विभाग कुंभकर्ण झोपेत झोपला आहे. वाहतूक पोलिसांसह आयआरबी व तत्सम अधिकारी, कर्मचारी यांना याबाबत कार्रवाई करावी, असे वाटत नाही का? की कायदा फक्त कागदावर आहे…दुचाकी वाहनावरून जाणाऱ्या सामान्य नागरीकाला आहे, बाकी उच्चभ्रू, ठेकेदार, संस्था यांना सूट देण्यात आली आहे का? असा प्रश्न नागरीकांमधून उपस्थित होत आहे.

खालापूर फाटा, शिळ फाटा येथील हजरत सय्यद गाजी बाबा दर्ग्यांसमोरील रस्त्यावर पांढऱ्या व पिवळ्या रंगाची रंगरंगोटीचे…पट्टे मारण्याचे काम मोठ्या जोमाने सुरु असल्याचे दिसून येत आहे. रस्त्याच्या मधोमध उभे राहून अनेक मजूर काम करताना दिसून येत आहेत. एकीकडे वाहनांना वेग नियंत्रण व अपघात रोखण्यासाठी महामार्गांवर नियमानुसार रस्ता सुरक्षेसाठी रंगीत पट्टे मारले जात आहे. तर दुसरीकडे बिनधास्तपणे नियम मोडून मजुरांच्या सुरक्षाची कोणतीच काळजी न घेता त्यांना सेफ्टी शूज, डोक्यात हेल्मेट, रेडीयम जॅंकेट न देता बेजबाबदारपणे मजुरांचा जीव धोक्यात टाकून दोन्ही बाजूने भरधाव वाहतूक सुरु असतांना कामे करून घेतली जात असल्याचे दिसून येत आहे.

तसेच याच महामार्गांवर साईट पट्टीवर डांबरी रस्ता खोदून ठिकठिकाणी केबल टाकण्यासाठी खड्डे खोदण्यात आले. मात्र, या खड्ड्यांमध्ये पुन्हा डांबराचा माल न टाकता खोदतांना निघणारी मातीच थातूरमातूर टाकून खड्डे बुजवले गेले आहेत तर काही खड्डे असेच सोडण्यात आले असल्याचे दिसून येत आहे. हायको कॉर्नर येथे रस्त्यावरच भला मोठा रस्त्याला टेंगुळ आला असून अपघाताला तो आमंत्रण देत आहे. पण हे मात्र ठेकेदार, आयआरबी व एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांना दिसत नाही का ? असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. ज्या ठिकाणी रंगरंगोटी करण्यात आली आहे, त्याच ठिकाणी एका दुचाकीचा अपघात झाला आहे. या अपघातात दुचाकी स्वार मृत्यूमुखी पडला आहे. रस्त्यावर चालणाऱ्या सर्वसामान्य दुचाकी वाहन चालकांना, नागरिकांनाच नियम, कायदा लागू आहे का ? रस्त्यावर सुरक्षेचा नियमांचे पालन न करता मजुरांकडून बेजबाबदारपणे काम करून घेणाऱ्या ठेकेदाराला व काम कशा पद्धतीने सुरू आहे हे न पाहणाऱ्या एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांना नियम, कायदा माफ आहे का ? रस्त्यावर रंगरंगोटी केल्याने अपघात रोखण्यात मदत होत असेल पत रस्त्यावर असलेले खड्डे, टेंगुळमुळे अपघातात भर पडणार नाही का ? यावर दुर्लक्ष का केले जात आहे ? ॲम्बुलन्सचा धंदा वाढविण्यासाठी की लोकसंख्या कमी करण्यासाठी, रस्त्यांवरील अपघात कमी करण्यात संबधितांना रस नाही का? असा संतप्त सवाल खोपोलीकरांमधून विचारला जात आहे.