नवी मुंबई शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर ) :-
जागेचा वाद व युट्युब चॅनेलवर बातमी प्रसारित केल्याचा राग मनात धरून कल्याण ग्रामीण भागातील पत्रकार विनोद वास्कर यांना काही समाजकंटकांनी दि. २८ मार्च रोजी शुक्रवारी दुपारच्या सुमारास भर चौकात मारहाण केली. या मारहाणीची सीसीटीव्ही सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पत्रकारांकडून देखील संताप व्यक्त करण्यात आला आहे…शिळ गावातील राहुल काटे आणि जितू आलिमकर यांनी फावड्याच्या दांडकाच्या सहाय्याने पत्रकार विनोद वास्कर यांना मारहाण केली आहे. या शीळ डायघर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रकारानंतर माध्यमांच्या प्रतिनिधींनी ठाणे पोलीस आयुक्त डॉ.आशुतोष डुंबरे यांच्याकडे कठोर कारवाईची मागणी केली आहे…
वास्कर हे आपल्या लेखणीतून गावच्या समस्या मांडत असतात…शुक्रवारी सकाळी ते शिळफाटा चौकात असताना कारमधून आलेल्या दोघांनी त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली…यावेळी काही नागरिकांनी मध्ये पडत वास्कर यांची सुटका केली…सध्या जखमी पत्रकार विनोद वास्कर यांच्यावर घणसोली येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत..
विनोद वास्कर यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर ठिकठिकाणाहून संताप व्यक्त करत तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्यात…
पत्रकारावर हल्ला करणे म्हणजे संविधानावर केलेला हल्ला आहे. पत्रकार हा लोकशाहीच्या चार स्तंभांपैकी एक स्तंभ हा पत्रकारिता आहे…ज्यांनी पत्रकारावर हल्ला केला असेल त्याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल करावा आणि त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे असे आ.राजेश मोरे यांनी सांगितले आहे…सत्ताधारी पक्षातील आमदार कारवाईची मागणी करत असताना लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावरील हल्ल्याबाबत राज्यात मंजूर कायद्याची अंमलबजावणी होत नसल्याने माध्यमांकडून मात्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे…तसेच काही पत्रकार संघटनांच्यावतीने ठाणे पोलीस आयुक्तांसह मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते. या सर्व घटनेनंतर शीळ डायघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपींवर भा.द.वि.नवीन कलम ११८(१),११५(२),३५१(२),३५२(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे…मात्र सद्यस्थितीत पोलिसांनी दाखल केलेले गुन्हे जामिनपात्र असल्याने आरोपींचा मुक्त संचार असल्याची देखील चर्चा दबक्या आवाजात सुरु आहेत…
महाराष्ट्रात लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांवरील हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे… पत्रकारच सुरक्षित नसतील तर महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनता सुरक्षित आहे का ?असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित होतोय.महाराष्ट्र हे कायदा आणि सुव्यवस्थेचं राज्य म्हणून ओळखले जाते…पण याच महाराष्ट्रातील पत्रकार कितपत सुरक्षित आहेत?हा गंभीर प्रश्न आहे…