धक्कादायक आत्मपरीक्षण! रायगड जिल्हा काँग्रेस पोरकं–नेतृत्व बदलाची गरज अनिवार्य… !

0
14

रायगड शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-

रायगड जिल्हा काँग्रेस पक्ष सध्या नेतृत्वाच्या अभावामुळे कमकुवत आणि विस्कळीत अवस्थेत आहे. माजी केंद्रीय आरोग्यमंत्री व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री स्व. बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांच्या निधनानंतर पक्षात प्रभावी नेतृत्वाची पोकळी कायम राहिलेली असून, यामुळे काँग्रेसचा एकेकाळचा बालेकिल्ला असलेला रायगड जिल्हा पक्षाच्या हातून हळूहळू निसटत चालला आहे.

ग्रामपंचायत ते जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये काँग्रेसने अनेकदा युतीधोरण, वरिष्ठांचे आदेश, किंवा मैत्रीपूर्ण लढतीच्या नावाखाली माघार घेतली. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये भ्रमनिरास निर्माण झाला असून, पदाधिकाऱ्यांनी विरोधी पक्षांना गुप्त पाठिंबा दिल्याचे आरोप कार्यकर्त्यांकडून करण्यात आले आहेत.पक्षाचे काही पदाधिकारी तर निवडणुकीपुरतेच सक्रिय होत असून,उर्वरित काळात कार्यकर्त्यांशी कोणताही संपर्क ठेवत नाहीत. बैठका घेतल्या जात नाहीत, संपर्क यंत्रणा निष्क्रिय असून कार्यकर्त्यांच्या मनोबलावर परिणाम झाला आहे.

दक्षिण रायगड भागाची परिस्थिती अधिकच गंभीर असून,सध्याच्या जिल्हाध्यक्षांनी या भागात आजतागायत कोणतीही पक्ष संघटनात्मक बैठक घेतलेली नाही. स्थानिक कार्यकर्त्यांना ओळखतही नाहीत, निवडणुकांमध्ये त्यांची भूमिका पूर्णतः निष्क्रिय असल्याचे दिसून येते. तळागाळातील कार्यकर्त्यांच्या समस्या, संवाद, सल्ला यांकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. यामुळे कार्यकर्त्यांचा पक्षावरचा विश्वास ढळत चालला आहे.

या परिस्थितीला जबाबदार असलेली आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे वरिष्ठ नेत्यांचे संपूर्ण दुर्लक्ष. अनेक ठिकाणी पदाधिकारी, कार्यकर्ते व सदस्य यांच्यात ताळमेळ उरलेला नाही. अंतर्गत गटबाजीचे रौद्र रूप कार्यकारिणीच्या सभांमध्ये उघड दिसून येते. प्रामाणिक काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना साईडलाईन केले जात आहे. ही अवस्था भयानक असून, पक्षाची मूळ रचना आणि मूल्यव्यवस्थाच डळमळीत झाली आहे.

रायगड जिल्ह्यात सध्या लोकप्रतिनिधी  मागण्या असून, ग्रामपंचायत, नगर पंचायत स्तरावर मोजकीच स्थानिक संस्थांमध्ये निवडून आलेले प्रतिनिधी त्यांच्या वैयक्तिक करिष्म्यामुळे विजय मिळवू शकले आहेत. जिल्हा कार्यकारिणीचे नेतृत्व, विशेषतः सध्याचे जिल्हाध्यक्ष यामध्ये निष्क्रिय ठरलेले आहेत. त्यांना ना जिल्ह्याच्या भौगोलिक रचनेची माहिती आहे, ना काँग्रेसच्या पारंपरिक मतपेढीचा अभ्यास आहे.

या पार्श्वभूमीवर आता रायगड जिल्ह्यासाठी नव्या नेतृत्वाची गरज अत्यंत तीव्रतेने जाणवते आहे. असा नेता हवा जो प्रामाणिक, निष्ठावान, स्वच्छ प्रतिमेचा, कार्यकर्त्यांशी सतत संपर्कात राहणारा, संघटनशील, मेहनती, दूरदृष्टी असलेला आणि ईतर पक्ष सोबत साटेलोटा न करणारा असेल. अशा नेत्या मार्फतच काँग्रेस पुन्हा जिल्ह्यात उभारी घेऊ शकते.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस राजेश शर्मा यांच्या उपस्थितीत मंगळवारी दी. 22 एप्रिल, 2025 रोजी रायगड जिल्हा काँग्रेसची एक महत्त्वाची सभा आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत नव्या जिल्हाध्यक्षाच्या निवडीसंदर्भात ठोस निर्णय घेण्याचीच नितांत गरज आहे. कार्यकर्त्यांमध्ये यासंदर्भात उत्सुकता असून, नव्या नेतृत्वासाठी मागणी जोर धरू लागली आहे.

स्व. अंतुले साहेबांच्या सुवर्णकाळाची आठवण करून देणाऱ्या नवचैतन्याची गरज आजच्या रायगड काँग्रेसला भासते आहे. कार्यकर्त्यांनी आता आत्मपरीक्षण करून, योग्य नेतृत्वाच्या मागणीसाठी एकत्र येणे ही काळाची गरज आहे. हाच काँग्रेसच्या नवजीवनाचा खरा मंत्र ठरू शकतो…