माणगाव शिवसत्ता टाइम्स (नरेश पाटील):-
वारकरी संप्रदायाच्या पताका खांद्यावर घेत समाजाला अध्यात्म, भक्ती व संस्कारांची शिकवण देणारे रायगड पुत्र ह.भ.प. आकाश भोंडवे महाराज यांचा भव्य व भक्तिपूर्वक सत्कार माणगाव येथे पार पडला. चारिझेन फाउंडेशनच्या वतीने आयोजित या स्वागत सोहळ्याचे आयोजन गुरुवार दि. 07 मे रोजी माणगाव रेल्वे स्टेशन येथे मोठ्या भक्तिभावात संपन्न झाले.
संतवाङ्मयाच्या सुवासाने न्हालेल्या वातावरणात ‘हरीनामाचा गजर, भक्तीचा सागर’ अशा गगनभेदी घोषणा झाल्या. महाराजांचा सत्कार पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला आणि परिसर भक्तिभावाने भारून गेला. या सोहळ्याला चारिझेन फाउंडेशनचे अध्यक्ष कॅप्टन एन. एस. रंधावा, उपाध्यक्ष सतीश काळे, समाजसेवक जगदीशभाई दोशी, सचिन वाघ, विलास आठवले, जय दोशी, किशोर झेमसे व अनेक भक्तजन उपस्थित होते.
ह.भ.प. भोंडवे महाराज हे रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पवित्र हिरकणी वाडी येथे गेली तीन वर्षे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करत असून, त्यांच्या या अथक सेवेमुळे संपूर्ण परिसर भक्तीमय व संस्कारित झाला आहे. त्यांच्या कार्यातून वारकरी संप्रदायाला नवी दिशा मिळाली असून, समाजात बंधुभाव, मानवता आणि अध्यात्मिक जागृतीचे बीज पेरले गेले आहे.
स्वागत समारंभात मनोगत व्यक्त करताना महाराज म्हणाले, “हरिनाम हीच खरी शक्ती आहे. ती समाजाला एकत्र बांधते, प्रेम व श्रद्धा निर्माण करते. जो भक्तीच्या मार्गावर चालतो त्याला कोणतीही अडचण भासत नाही.” या प्रसंगी चारिझेन फाउंडेशनच्यावतीने समाजातील तरुणांना धर्म, शिक्षण आणि समाजसेवेत सक्रीय होण्याचे आवाहन करण्यात आले. या प्रेरणादायी कार्यक्रमामुळे माणगाव परिसरात अध्यात्मिक चैतन्याची लहर उसळली असून, सामाजिक सलोख्याचा संदेशही यातून दिला गेला.