माणगाव शिवसत्ता टाइम्स (नरेश पाटील):-
शहरातील खांदाड विभागातील वॉर्ड क्रमांक १६ मध्ये गेल्या दोन महिन्यांपासून नियमित कचरा उचल सुरू झाल्याने परिसरात स्वच्छता आणि शिस्त पुन्हा प्रस्थापित झाली आहे. या वर्षी 27 मार्च २०२५ पर्यंत, वॉर्ड १६ मधील नागरिकांना कचरा व्यवस्थापनाच्या गंभीर अडचणींचा सामना करावा लागत होता. काहीवेळेस पाच दिवसांहून अधिक काळ घरगुती कचरा न उचलल्याने रस्त्यावर कचऱ्याचे ढिग तयार होत होते. कुत्र्यांनी कचऱ्याचे डबे उलथवून परिसरात दुर्गंधी आणि घाणीचे वातावरण निर्माण केले होते. उंदीर, साप यांचा धोका देखील वाढल्याने महिलांमध्ये आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते.
या समस्येची दखल स्थानिक माध्यमांनी घेतल्यावर, माणगाव नगर पंचायत सक्रिय झाली. नगरपंचायत अंतर्गत कचरा व्यवस्थापनासाठी नेमलेल्या कंत्राटदार यांना या बाबत जाब नक्कीच विचारण्यात आली असेलच आणि त्याला जबाबदार ही धरण्यात आले. त्यानंतर वॉर्ड १६ मध्ये कचरा उचल सेवा दररोज वेळेवर सुरू झाली. गेल्या दोन महिन्यांत तांत्रिक कारणाशिवाय एकही दिवस सेवा बंद राहिलेली नाही. नागरिकांचा विश्वास पुन्हा निर्माण झाला आहे. या बदलामागे एक महत्त्वाचे नाव आहे कुणाल सिद्दार्थ गवाणे. कचरा गाडीचे चालक म्हणून त्यांच्या नियमित नियुक्तीनंतर सेवा पुन्हा पूर्ववत सुरू झाली आणि ती समाधानकारकरीत्या चालू आहे. नागरिकांना जेव्हा समजले की कुणाल परत आले आहेत, तेव्हा वॉर्ड १६ मध्ये आनंदाचे आणि दिलासा मिळाल्याचे वातावरण निर्माण झाले. त्यांनी नागरिकांचा विश्वास पुन्हा मिळवला आणि त्यांना सांगितले, “काळजी करू नका, मी परत आलोय.” त्यांच्या या आश्वासक भूमिकेने लोकांचे मन जिंकले. त्यांच्या परतीनंतर अनेक महिला आणि पुरुषांनी त्यांच्यासमोर आधीच्या बिनधास्त आणि गोंधळलेल्या सेवेबद्दल आपली नाराजी व्यक्त केली. कुणाल गवाणे हे खांदाड परिसरातील प्रत्येक वळण आणि गल्लीला परिचित आहेत. त्यांच्या सेवाभावी वृत्तीमुळे आणि माणुसकीच्या भावनेने ते प्रत्येक नागरिकाला आपले वाटतात.
कुणाल यांचे मन मोठे आहे आणि लोकांच्या गरजांबाबत त्यांना अचूक समज आहे. कामकाज हाताळण्याची त्यांची कुशलताही स्पष्ट दिसून येते. कोविड-१९ महामारी दरम्यान तसेच “निसर्ग” चक्रीवादळाच्या संकटकाळातही त्यांनी आरोग्य आणि स्वच्छतेसाठी अग्रभागी भूमिका बजावली होती. त्यांची तत्परता आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव आजही जाणवते. वॉर्ड १६ मध्ये स्वच्छतेचा स्तर सुधारला असला तरी, उर्वरित १६ वॉर्डांमध्येही अशीच सुधारणा झाली आहे का, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. खांदाडचा हा सकारात्मक बदल प्रशासनाच्या सक्रियतेचा आणि नागरिकांच्या जागृतीचा उत्तम उदाहरण आहे. आता माणगावकरांना अशीच स्वच्छता आणि जबाबदारीची अपेक्षा संपूर्ण शहरात आहे. वॉर्ड क्रमांक १६ मध्ये घडलेला हा स्वच्छतेचा पुनर्जन्म हे दाखवून देतो की योग्य नियोजन, वेळेवर कृती आणि जबाबदार कर्मचाऱ्यांची साथ असेल, तर कोणतीही समस्या सुटू शकते. कुणाल गवाणे सारख्या कर्मचाऱ्यांचे योगदान हे केवळ उदाहरणवत नाही, तर प्रेरणादायीही आहे. अशा प्रयत्नांना संपूर्ण माणगाव शहरात बळ मिळावे, हीच अपेक्षा.