माणगाव शिवसत्ता टाइम्स (नरेश पाटील):-
खांदाड गावात सांडपाण्याचा गंभीर प्रश्न उभा ठाकला असून, त्यामुळे स्थानिक नागरिकांच्या आरोग्यावर मोठा परिणाम होत आहे.माणगाव बाजारपेठ व मोर्बा रोड परिसरातून येणारे दुर्गंधीयुक्त व अस्वच्छ सांडपाणी पावसाच्या पाण्यासोबत नाल्यामार्गे थेट खांदाड गावाच्या हद्दीत वळवले गेले आहे.
या सांडपाण्यामुळे गावातील मोठे व लहान तलाव प्रदूषित झाले असून, त्याठिकाणी साठलेले पाणी ओसंडून आसपासच्या खालच्या भागांत पसरत आहे. परिणामी परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. नागरिकांचे श्वास घेणे कठीण झाले असून, अनेकांना डोकेदुखी, मळमळ, त्वचारोग व इतर शारीरिक त्रास जाणवत आहेत.
या परिस्थितीला आणखी गंभीर बनवणारा एक मुद्दा म्हणजे खांदाडमधील एका भागात गेल्या वर्षभरापासून सेप्टिक टँकमधून येणाऱ्या अत्यंत घाणेरड्या वासाचा त्रास सुरू आहे. शिवाय, दुसऱ्या नालेसदृश पावसाळी वाहिन्याचे काम अर्धवट सोडण्यात आले असून, त्या अर्धवट नाल्यात काही रहिवासी थेट सांडपाणी सोडत असल्याचे समजते. विशेषतः जोरदार पावसाच्या वेळी या नाल्यांमधून सांडपाणी ओसंडून वाहते आणि संपूर्ण परिसरात दुर्गंधी पसरते, ज्यामुळे नागरिकांना जबरदस्त त्रास सहन करावा लागतो.
आज दिवसभर सुरू असलेल्या संततधार पावसामुळे परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. या भीषण दुर्गंधीमुळे नागरिकांना दुहेरी मास्क घालण्याची वेळ आली असून, अनेक घरांमध्ये खिडक्या व दरवाजे बंद करून बसावे लागत आहे. थोडक्यात सांगायचे झाले, तर खांदाड गाव अक्षरशः गटाराच्या दुर्गंधीत अडकले आहे.
डासांचा उपद्रव प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे. परिणामी डेंग्यू, मलेरिया,व्हायरल ताप यांसारख्या आजारांचा मोठा प्रादुर्भाव होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.नुकत्याच झालेल्या पावसामुळे रस्ते व रहिवासी भागांत पाणी साचून अस्वच्छता पसरली आहे.
या पार्श्वभूमीवर, सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला असून, स्थानिक स्वराज्य संस्थांनी तातडीने पावले उचलणे गरजेचे ठरते. सांडपाण्याचा प्रवाह थांबवणे, साठलेले पाणी काढून टाकणे, संपूर्ण परिसरात निर्जंतुकीकरण करणे, स्वच्छता मोहीम राबवणे तसेच अर्धवट नाल्याचे काम पूर्ण करणे ही काळाची गरज बनली आहे.स्थानिक नगरसेवक, लोकप्रतिनिधी, माणगाव नगर पंचायत आणि आरोग्य विभागाने या समस्येकडे प्राधान्याने लक्ष देऊन त्वरीत कार्यवाही करावी,अशी स्थानिक नागरिकांची ठाम मागणी आहे.