रायगड शिवसत्ता टाइम्स (नरेश पाटील):-
कोकणातील ज्वलंत काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांच्या मनातील हक्काचं नाव ठरलेले राजेंद्र म.ठाकूर उर्फ ‘राजाभाऊ’ यांची अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व कोकण विभागाचे प्रभारी मा. वि. बी. वेंकटेश यांच्या दि. १९ जून २०२५ (गुरुवार) रोजी होणाऱ्या रायगड दौऱ्यासाठी समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे संपूर्ण कोकणात, विशेषतः रायगड काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारले आहे.
राजाभाऊ ठाकूर हे केवळ एक निष्ठावान कार्यकर्तेच नव्हे, तर जनतेशी सतत संपर्कात राहून कार्य करणारे आणि पक्षाच्या नाडीवर नेमकी पकड असलेले नेतृत्व म्हणून ओळखले जातात. श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात त्यांनी जुने काँग्रेस मतदार पुन्हा पक्षाकडे वळवले असून, नवमतदारांनाही पक्षाशी जोडण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकांदरम्यान निरीक्षक म्हणून त्यांनी आपली ठसा उमटवणारी कामगिरी बजावली आहे.
काही महिन्यांपूर्वी राज्य काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस मा. राजेश शर्मा हे रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. त्या वेळी त्यांनी काँग्रेस पक्षाची रायगड जिल्ह्यातील स्थिती जाणून घेण्यासाठी श्रीवर्धन मतदारसंघाचा दौरा केला होता. त्यावेळी राजाभाऊ ठाकूर यांच्या बळकटीमुळे झालेला काँग्रेस कार्यकर्त्यांचा भव्य उत्स्फूर्त मेळावा व नागरिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती पाहून मा. शर्मा अत्यंत प्रभावित झाले होते. माध्यमांशी बोलताना त्यांनी म्हटलं होतं की, “मी पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून राजाभाऊ ठाकूर यांच्या हातात असे बळ देईन की, काँग्रेस पक्ष श्रीवर्धन मतदारसंघाची जागा पुन्हा जिंकेल.”
या आश्वासनाच्या पार्श्वभूमीवर राजाभाऊ ठाकूर यांना अलिबाग येथे होणाऱ्या आगामी बैठकीसाठी समन्वयक म्हणून दिलेली जबाबदारी, ही त्यांच्या नेतृत्वावर ठेवलेला विश्वास तर आहेच, पण आगामी काळात त्यांना पक्षात अधिक महत्त्वाची जबाबदारी दिली जाईल, अशी जोरदार चर्चा कोकण काँग्रेसमध्ये आहे.त्यांच्या या नियुक्तीमागे पक्षश्रेष्ठींनी दाखवलेला विश्वास हा त्यांच्या प्रदीर्घ पक्षनिष्ठेचा, कार्यकर्त्यांशी असलेल्या थेट संबंधाचा व कोकणातील प्रभावी नेतृत्वाची पोचपावती मानली जात आहे. येत्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद व इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रायगडमध्ये होणाऱ्या या बैठकीला विशेष महत्त्व आहे. या बैठकीस मा. राजेश शर्मा यांचीही उपस्थिती राहणार आहे.
राजाभाऊ ठाकूर यांच्या समन्वयक म्हणून झालेल्या निवडीची बातमी समजताच हजारो काँग्रेस कार्यकर्त्यांनी अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. ही नियुक्ती कोकणातील काँग्रेससाठी एक नवीन ऊर्जा केंद्र आणि प्रेरणास्थान ठरेल, असा विश्वास त्यांच्या सहकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
या दरम्यान रायगड जिल्हा मुख्य ठिकाणी अलिबाग येथे गुरुवारी दि. १९ रोजी सकाळी ११ ते दुपारी १ वाजता च्या वेळेत काँग्रेस कार्यकर्ते यांचे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव तथा कोकण विभागाचे प्रभारी माननीय वी. बी. व्यंकटेश यांच्या खास उपस्थितीत बैठक पार पडणार आहे.