रायगड शिवसत्ता टाइम्स (धम्मशिल सावंत):-
रायगडच्या पेण तालुक्यातील दूरशेत गावातील ग्रामस्थांनी ओव्हरलोड वाहतुकीच्या विरोधात एल्गार केलाय.ओव्हरलोड वाहतुकीने नागरिकांच्या जीविताला धोका असल्याने ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झालेत. या गावात सुरू असलेली ओव्हरलोड वाहतूक आणि या वाहतुकीमुळे संपूर्ण गाव भययुक्त झाल्यामुळे गावकऱ्यांनी अखेर रास्ता रोको आंदोलन करण्याचा पवित्रा घेतलाय. या आंदोलनात संपूर्ण दूरशेत गाव सहभागी झाला असून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आणि प्रशासन सुद्धा घटनास्थळी पोहचलेय. ओव्हरलोड वाहतुकीमुळे गावच्या परिसरामध्ये अनेक अपघात झाल्याचे घटना देखील घडलेले आहेत. गावातील नागरिकांना याचा मोठा मनस्ताप मागील कित्येक वर्ष सहन करावा लागतोय. गावच्या शेजारी असणाऱ्या सांकशी किल्ल्यालगत मोठ्या प्रमाणात उत्खनन होत असून येथून निघणारा दगड दुरशेत रस्त्यावरून घेऊन नेला जातो यामुळे गावात रस्त्यांची आणि परिसराची दुरावस्था झाली आहे. त्याच कारणामुळे गावकऱ्यांनी रास्ता रोको करण्याचा आज निर्णय घेतला.