नवी मुंबई शिवसत्ता टाइम्स (दीपक कांबळे) :-
कधी गॅसलाईन तर कधी केबललाईन कधी पाणीपुरवठा तर कधी मलवाहिनी या कामांसाठी वारंवार रस्त्याची खोदाई केली जाते.खारघर रेल्वे स्थानकापासून सेक्टर १० रस्ता,हिरानंदनी पासून तर सेक्टर १२ च्या दिशेने जाणारा रस्ता यांसह शहराच्या बहुतेक सगळ्याच भागांत खोदकाम सुरू असल्याने नागरिकांना मोठा मनःस्ताप सहन करावा लागत आहे.यापैकी अनेक रस्त्यांवर काही दिवसांपूर्वीच डांबरीकरण झाले असताना, या रस्त्यांवर पुन्हा खोदकाम केले जात असल्याने पनवेल महानगरपालिका विविध विभागांमधील समन्वयाचा अभाव पुन्हा अधोरेखित झाला आहे. सेक्टर १० मधील बँक ऑफ इंडिया चौक तसेच कोपरगाव गेट क्रमांक ५ रस्त्यावरील खोदकाम नेमके कशासाठी सुरू आहे, याचा थांगपत्ता महापालिकेच्या अधिकाऱ्यांनाही नाही.
काही महिन्यांपूर्वी जल व मलवाहिन्या टाकण्याचे काम केले होते. यानंतर आता पुन्हा एकदा गेट क्रमांक पाच रस्त्यावर जलवाहिन्यांसाठी खोदकाम करून त्या खड्ड्यावर माती टाकून सोडून दिल्याने जवळपास अर्धा रस्ता बंद झाला आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात येते. परिणाम वाहतूक कोंडी तसेच शालेय विद्यार्थ्यांचा नेहमीचा बस प्रवास बंद . शालेयबस नेहमीच्या रस्त्याने येणार की नाही, याचीच विद्यार्थ्यांना कल्पना नाही. एक महिना पूर्वी डांबरीकरण केलेला रस्ता पुन्हा खणला असल्याने तेथील नागरिकांना चांगलीच तारेवरची कसरत करावी लागत आहे. या विषयावर खारघर प्रभाग अधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.
एक महिन्यापूर्वी डांबरीकरण केलेला रस्ता दोन वेळा खोदण्यात आला.खोदकामामुळे वाहतूक कोंडी होतेच.त्या खड्ड्या वर माती टाकून सोडून दिल्याने पावसामुळे होणारा चिखल व दुर्गंधीमुळे येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित होतो.यावर प्रभाग अधिकाऱ्याने गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.