नवी मुंबई शिवसत्ता टाइम्स (शेखर म्हात्रे ):-
दिवाळी आली की सगळ्यांना आतुरता लागते ती बहिरीदेव उत्सवाची…आई एकविरेचा भाऊ असलेला देव बहिरीनाथ हा बारा महिने समुद्रात विसावलेला असतो…प्राचीन संस्कृतीमध्ये आई एकविरेचा भाऊ असलेल्या बहिरीनाथाचा उल्लेख आढळतो…नवी मुंबईतील बेलापूर जवळच समुद्राला लागून असलेल्या दिवाळे कोळीवाडा मध्ये गेली अनेक वर्ष बहिरीदेवाचा उत्सव तीन दिवस मोठया जल्लोषात आणि थाटामाटात साजरा करण्यात येतो… बेलापूर पट्टीतील दिवाळे कोळीवाड्याचे श्रद्धास्थान असलेल्या बहिरीनाथ देवाच्या यात्रेला उत्साहात सुरुवात झाली.नरक चतुर्दशीच्या दिवशी संध्याकाळी सहा वाजता उत्सवास प्रारंभ झाला…लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सकाळी सहा वाजता बहिरीनाथाला अभिषेक करण्यात आला. तर संध्याकाळी सात ते दहा वाजेपर्यंतच्या कालावधीत पालखी मिरवणूक काढण्यात आली…गेल्या वर्षी बहिरीदेव एक वर्ष उशिरा भेटले होते.. आणि कोरीव दगडी पाषाणची मूर्ती खंडित झाली होती म्हणून यावर्षी बहिरीदेवाची नवीन दगडी पाषाण मूर्तीची नव्याने प्राणप्रतिष्ठापणा करण्यात आली. सलग पाच दिवस हा सोहळा सुरु होता. 29,30 आणि 31 तारखेला प्राणप्रतिष्ठापणा सोहळा आणि होम हवन करण्यात आले. 1 तारखेला पालखी सोहळा आणि 2 तारखेला विसर्जन सोहळा मोठया थाटात संपन्न झाला… बलिप्रतिपदेच्या दिवशी देवाचा नवस गावकरी फेडतात, तर दुपारी साडेबारा ते चार वाजेपर्यंत विसर्जन सोहळा पार पडला… हा उत्सव आनंदात पार पाडण्यासाठी सर्व ग्रामस्थ, स्थानिक नगरसेवक, विविध सामाजिक संस्थांचे सहकार्य लाभत असल्याचे बहिरीनाथ दीपोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. पुरातन काळापासून सुरू असलेली दिवाळे कोळीवाडा गावातील बहिरीनाथची यात्रा आजही मोठ्या उत्साहात साजरी केली जाते…ऐन दिवाळीच्या सणात अश्विन शुद्ध आमावस्येला या यात्रेला सुरुवात होते. तीन दिवस चालणाऱ्या या यात्रेला संपूर्ण बेलापूर पट्टीतील कोळीबांधव दर्शनासाठी येतात. बहिरीनाथ देवाचे दिवाळे कोळीवाडा येथे कोणतेही मंदिर नाही, बहिरीनाथाची मूर्ती घारापुरी येथील समुद्रात खोलवर एका पाषाणात असते.या यात्रेला सुरुवात होण्याआधी दिवाळे गावातील ग्रामस्थ बहिरीनाथाच्या शोधासाठी बोटीने खोल समुद्रात जातात…पंचक्रोशीतील ग्रामस्थांपैकी दिवाळे गाव येथील ग्रामस्थांना समुद्रात बहिरीनाथाची मूर्ती दरवर्षी आढळून येते…समुद्रात शोधाशोध केल्यावर मूर्ती मिळाल्यानंतर उत्साहाने या मूर्तीचे संपूर्ण गावात मिरवणुकीद्वारे जल्लोषात स्वागत केले जाते…तीन दिवसांत हजारो भाविक बहिरीनाथाच्या दर्शनासाठी दिवाळे कोळीवाडा येथे येतात…बहिरीनाथ देवाच्या यात्रेचे पावित्र्य तरुणांच्या मद्यपान, फटाक्यांच्या आतिषबाजीत नष्ट होताना दिसून येत आहे… विशेष म्हणजे तरुणांसह लहान-लहान मुलेदेखील हातात फटाके फोडून धोका निर्माण होईल असे कृत्य करत आहेत. तरुणवर्गाने शेकडो वर्षाच्या बहिरीनाथ देवाच्या यात्रेचे पावित्र्य जपावे, असे आवाहन अन्य रहिवाशांनी केले आहे.