पनवेल शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर ) :-
देशासह राज्यात भाजप आणि महायुती विरोधात वातावरण आहे… लोकसभेला महाराष्ट्रात भाजप आणि महायुतीला साथ मिळाली नाही… हेच वातावरण विधानसभेला कायम आहे…महागाई,बेरोजगारी,राजकीय पक्षांची फोडाफोडी ,बेनामी काळ्या पैशाची उलाढाल,पेट्रोल-डिझेलचे वाढते दर,शेतकऱ्यांचे प्रश्न तसेच असल्याने जनता सरकार विरोधात आहेत… त्यामुळे विधानसभेला भाजप आणि महायुती पराभूत होणार असे लोक नाक्यानाक्यावर उघडपणे बोलत आहेत… असे असताना भाजपच्या काही विधानसभा जागा वाचविण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीतील काही घटक पक्ष आणि त्यांचे नेते करीत आहेत…पनवेल,उरण विधानसभा हे त्याचे जिवंत उदाहरण आहे… सोशल मीडियात एक वेगळीच चर्चा सुरु आहे… ही चर्चा पनवेल आणि उरणबाबत आहे… हे दोन्ही मतदारसंघ भाजपला आंदण देण्याचा राजकीय व्यवहार झाल्याचे बोलले जात आहे…त्यामुळे निष्ठावंत शिवसैनिकांबरोबर महाविकास आघाडीच्या निष्ठावंत कार्यकर्त्यातही संताप आहे…पनवेलमध्ये नेहमीच शिवसेनेचे आपल्याच लोकांनी खच्चीकरण केल्याची भावना शिवसैनिकात आहे…शिवसेना एक होती त्यावेळीही आणि आता शिवसेना फुटून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना असे रूपांतर झाल्यावरही खच्चीकरण सुरूच आहे…याबाबत निष्ठावंत शिवसैनिकांनी काही सवाल उभे केले आहेत…मुंबई,कोकणसह राज्यात मजबूत असलेली उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पनवेल विधानसभा मतदारसंघामध्ये नेहमी मजबूर का राहिली ?असा हा राजकीय आग लावणारा सवाल ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसैनिकातून चर्चिला जात आहे…या सवालानेनिष्ठावंत शिवसैनिक हैराण आहेत…चुलीत गेले राजकारण… असे उदगार त्यांच्या तोंडातून निघत आहेत…पनवेलचा निष्ठावंत शिवसैनिक एवढा कधी दुखावला गेला नव्हता.. तो विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर दुखावला गेलाय… आज तो पुरता कोलमडून पडलाय… त्याच्या स्वाभिमानालाच उघडपणे पायदळी तुडवून ठेचण्यात आले… यापूर्वी प्रत्येक विधानसभा,मनपा,जि.प.,पं.स निवडणुकात राजकीय सौदेबाजी झाल्याची शिवसैनिकांची भावना आहे…आजही यात बदल झालेला नाही… हे असेच सुरु राहिल्यास पनवेलमध्ये निष्ठावंताची शिवसेना दुर्बीण घेऊन शोधावी लागेल…विधानसभा निवडणुकीचे दूरगामी परिणाम भविष्यातील मनपा,जि.प.व पं.स निवडणुकांवर होणार आहेत…पनवेलमध्ये शिवसेना मजबूर करणारा झारीतील शुक्राचार्य कोण ? याचा शोध घ्या …असे निष्ठावंत शिवसैनिकांचे वरिष्ठांना साकडे आहे…