पनवेलमध्ये शेकापचे वर्चस्व गावापुरतेच…शहरी पट्ट्याने शेकापला पुन्हा नाकारले… 

0
49

पनवेल शिवसत्ता टाइम्स (वार्ताहार):-

भाजपचे पनवेल भागातील प्रभावी आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधानसभा निवडणुकीत ५१ हजार मतांनी विजय मिळवला असला तरी या भागातील ग्रामीण भागात शेतकरी कामगार पक्षाला मिळालेली आघाडी ठाकूरांसाठी डोकेदुखी ठरली आहे…लोकसभा निवडणुकीतच पनवेल मतदारसंघातून महायुतीला अपेक्षित मताधिक्य मिळाले नव्हते. शेकाप आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील घोळामुळे पनवेलमध्ये महाविकास आघाडीला यश मिळणे कठीण असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत होते. असे असताना पहिल्या काही फेऱ्यांमध्ये मिळालेले मताधिक्य आणि ग्रामीण भागात शेकापने टिकवलेले वर्चस्व हे या मतदारसंघाचे वेगळेपण ठरले…शेकापच्या बाळाराम पाटील यांना ग्रामीण पनवेलने मोठी साथ दिली…मात्र या मतदारसंघातील शहरी पट्ट्याने शेकापला पुन्हा नाकारल्याचे पाहायला मिळाले…या मतदारसंघात ३ लाख ८२ हजार ३३५ मतदान झाले होते…यापैकी प्रशांत ठाकूर यांना १ लाख ८२ हजार ९३१ मते मिळाली…तसेच शेकापचे बाळाराम पाटील यांना १ लाख ३२ हजार ८४० मते मिळाली. ठाकूर हे ५१,०९१ मतांनी जिंकले…पनवेलमध्ये तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या ठाकरे सेनेच्या लीना गरड यांना ४३,९८९ मते मिळाली…मनसेचे योगेश चिले यांना १०,२३१ मते मिळाली…महाविकास आघाडीत ठाकरे सेना आणि शेकाप एकत्र लढली असती तरी ठाकूरांचा विजय निश्चित होता असे मानले जात असले तरी त्यांच्यापुढील आव्हान मात्र वाढले असते… या निवडणुकीत सुरुवातीला पाचव्या मतमोजणीच्या फेरीपर्यंत १ ते ११६ बुथमध्ये ओवे पेठे, ओवेकॅम्प, तोंडरे, काेयनावेळे, देवीचा पाडा, ढोंगऱ्याचा पाडा, शिरवली, पालेखुर्द, तळोजा पेठार्ली, तळोजा पाचनंद, पेणधर, घोट, खैरणे खुर्द, वावंजे, तळोजा मजकूर, खुटारी, रोहिंजण, पिसार्वे, नितळस, धानसर, धरण कॅम्प, तुर्भे या गाव आणि तळोजा वसाहतीमधील ८१,९०७ मतांपैकी बाळाराम पाटील यांनी ३४,८९१ तर प्रशांत ठाकूर यांना ३४,२०७ मते मिळाली. या परिसरातून बाळाराम पाटील हे आघाडीवर होते…ज्यावेळेस सहाव्या फेरीची मतमोजणी सुरू झाली तेव्हापासून खारघर वसाहतीची मतमोजणी सुरू झाल्याने चित्र बदलण्यास सुरुवात झाली…बुथ क्रमांक १४१ ते १६५ पर्यंत ठाकूर यांना खारघरमधून मताधिक्य मिळण्यास सुरुवात झाली…खारघरमधील मतदारांनी ठाकूर यांना सहाव्या फेरीत ४,८९२ मतांचे सुरुवातीला मताधिक्य दिले…त्यानंतर आठव्या फेरीत कोपरा गाव, बेलपाडा गाव, खारघर वसाहतीचा काही भाग आणि मोरबे, रिटघर, खैरवाडी, रोडपाली, खिडुकपाडा या गावातील १६,७८० मतांची मोजणी केल्यावर ठाकूरांचे मताधिक्य ११,६३८ ने वाढले…नवव्या आणि दहाव्या फेरीत २९,०८१ मतांच्या मोजणीनंतर वळवली,दुंदरे,केवाळे,वांगणी तर्फे वाजे, वाकडी, टेंभोडे या गावांसह कळंबोली वसाहतीमधून शेकाप पिछाडीवरच राहिला…तोपर्यंत ठाकूर यांचे मताधिक्य १०,८५१ पोहचले होते…अकराव्या आणि बाराव्या फेरीत कळंबोलीचा निम्मा भाग आणि कामोठे शहराचा निम्मा भागातील २७ हजार मतांची मोजणी केल्यानंतर ठाकूर यांचे मताधिक्य १५,५९३ ने वाढले होते. १३ आणि १४ व्या फेरीत कामोठे शहर २९ हजार मतांच्या मोजणीनंतर ठाकूर यांचे मताधिक्य सर्वाधिक २२,९७४ पोहचले होते…१७ आणि १८ व्या फेरीत नवीन पनवेल, खांदेश्वर वसाहतीमधून २७ हजार मतांच्या मोजणीनंतर ठाकूरांना ३७,३१९ मताधिक्य मिळाले होते. १९ आणि २० व्या फेरीत नवीन पनवेल वसाहतीच्या पूर्ण परिसराच्या मतमोजणीनंतर ठाकूरांचे मताधिक्य ४४,८४१ मतांवर पोहचले होते…पनवेल शहरातील ३० हजार मतांची मोजणी २१ आणि २२ व्या फेरीत झाल्यानंतर ठाकूर यांना ४८,५०६ मतांचे मताधिक्य मिळाले…लाडक्या बहिणीसह खारघर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचा लाभ प्रशांत ठाकूर यांना झाल्याचे बोलले जात आहे. पनवेलमधील पाणीटंचाई, मालमत्ता कर आणि नैना प्रकल्प या मुद्दयांचा शेकापचे बाळाराम पाटील यांनी समाजमाध्यमांवर प्रभावी प्रचार केला.