कर्जत शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-
कर्जत विधानसभा मतदारसंघात परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे गेलेल्या सुधाकर घारे यांनी निकालाला आव्हान देत फेरमतमोजणीची मागणी केली होती. निवडणूक आयोगाने सुधाकर घारे यांची मागणी मान्य केली असून कर्जत मतदारसंघातील काही मतदान केंद्रांची फेरमतमोजणी होणार असल्याने निकाल काय येतो, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
कर्जत खालापूर मतदारसंघातील मतदार आपल्या बाजूने होते. मतदारांनीच निवडणूक हातात घेतली होती. जनतेला बदल हवा होता. जनतेने मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला…कर्जत खालापूरमधील जनता आम्ही सुधाकर घारे यांना मतदान केल्याचे सांगत असताना निकाल वेगळा कसा लागला? असा प्रश्न सुधाकर घारे यांनी उपस्थित केला होता. खोपोलीमध्ये मतदानाच्या दिवशी बोगस मतदान झाल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी कबूल केल्याचे घारे यांचे म्हणणे आहे…असे अनेक संशयास्पद मुद्दे दाखवून सुधाकर घारे यांनी निवडणूक आयोगाकडे फेरमतमोजणीची मागणी केली होती…
20 नोव्हेंबरला कर्जत मतदारसंघात मतदान होऊन, 23 नोव्हेंबरला मतमोजणी झाली…5 हजार 694 मतांनी सुधाकर घारे यांचा या निवडणुकीत निसटता पराभव झाला. मतमोजणीच्या एकूण 26 पैकी 22 फेऱ्यामध्ये सुधाकर घारे आणि विजयी उमेदवार महेंद्र थोरवे यांच्यात जोरदार रस्सीखेच होती. खोपोली नगरपालिकेच्या हद्दीत थोरवे यांनी आघाडी घेतली.. त्यामुळे खोपोलीत गडबड झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर सुधाकर घारे यांनी निकालाला आव्हान देत फेरमतमोजणीची मागणी केली होती. निवडणूक आयोगाने आपली मागणी मान्य केली असल्याचे सुधाकर घारे यांनी म्हटले आहे.