मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम रखडलेल्या अवस्थेत… महायुती सरकार महामार्गाकडे गांभीर्याने लक्ष देणार का ?

0
45

रायगड शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):- 

लोकसभा निवडणुकीपूर्वी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याचे आश्वासन नेतेमंडळींनी आपल्या भाषणातून दिले होते… मात्र सध्या सुरू असलेले काम संथगतीने सुरू असून मार्गावरील अनेक पुलांची कामे अद्याप अपूर्ण आहेत… ही सर्व कामे पूर्ण होण्यास कमीत कमी दोन वर्षे लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे… मुंबई-गोवा महामार्गावरील वडखळपर्यंतच्या रस्त्याचे बहुतांश काम पूर्ण झाले आहे… मात्र नागोठणे, कोलाड,पुई, माणगाव येथील प्रमुख पुलांचे काम अद्याप वेग धरू शकलेले नाही… पळस्पे ते इंदापूर हा 84 किलोमीटरचा रस्ता सर्वांत तापदायक होता…याचे दोन टप्प्यांत विभाजन केल्यानंतर पळस्पे ते कासूपर्यंत काम पूर्ण होत आले आहे… मात्र त्यानंतरचे काम अनेक ठिकाणी ठप्प आहे… त्यामुळे नव्याने सत्तेत आलेले महायुती सरकार तरी महामार्गाकडे गांभीर्याने लक्ष देईल, अशी अपेक्षा प्रवासी तसेच वाहनचालकांकडून व्यक्त होत आहे… पळस्पेपासून माणगावपर्यंत पूर्ण झालेल्या मार्गाच्या दुभाजकामध्ये शोभेची झाडे लावण्यात आली आहेत… काही ठिकाणी दिशादर्शक फलक लावून काम पूर्ण होत असल्याचे दाखवण्यात येत आहे; मात्र वडखळपासून कशेडी खिंडीपर्यंत महामार्गाची पाहणी केली असता प्रमुख पुलांचे काम 20 टक्केही पूर्ण झाले नसल्याचे दिसून येत आहे… या उड्डाणपुलांसाठी मोठ्या प्रमाणात मातीचा भराव करावा लागणार आहे, तर काही पुलांचे कॉक्रिटीकरण काढावे लागणार आहे… जुन्ऱ्या आराखड्यानुसार हे काँक्रिटीकरण झाले असून आताच्या वाढलेल्या वाहतुकीला ते अडथळ्याचे ठरत आहे… या उड्डाणपुलाच्या कामाला वेळ लागेल, याचे स्पष्टीकरण मध्यंतरी माजी सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी जाहीर भाषणात केले होते… त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गाचे काम कधी पूर्ण होणार याकडे कोकणवासीयांचे लक्ष लागले आहे… मुंबई-गोवा महामार्गाचे काम 2010 पासूनच सुरू आहे… ठेकेदारांच्या निष्काळजीमुळे महामार्गाचे काम रखडले आहे. काम पूर्ण होण्यासाठी स्थानिक नागरिकांनी वेळोवेळी आंदोलने केली आहेत… मार्गामुळे दळणवळणालाही मोठा फटका बसत आहे… सुरुवातीला मुंबई-गोवा महामार्ग हा बीओटी तत्त्वावर बांधला जाणार होता; मात्र निधी उपलब्ध मिळूनही दोन-तीन ठेकेदारांनी पळ काढल्याने महामार्गाचे काम रखडले आहे… केंद्र व राज्य सरकारच्या मंत्र्यांनीही मार्गाबाबत अनेकदा खंत व्यक्त केली आहे… माणगाव बायपासचे काम न केल्याने चेतक कंपनीला ब्लॅकलिस्ट करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे… आचारसंहितेनंतर बायपासच्या कामासाठी निविदा काढल्या जाणार होत्या… माणगावच्या दुतर्फा रस्ता तयार करणे गरजेचे आहे… तिथे 100 वॉर्डन्स लावण्यासंदर्भात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सांगितले आहे… त्याच्या पुढच्या रस्त्याचे काम एलएनटीकडे असून बहुतांश काम पूर्ण झाले आहे…