रायगड शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-
महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात तिन्ही पक्षांकडून नवीन चेहऱ्यांना मंत्रिपदाची संधी दिली आहे. त्यात तिन्ही पक्षातील ज्येष्ठ नेते नाराज झाले असून, ते उघडपणे नाराजी व्यक्त करत आहे. तसेच पक्षश्रेष्ठींवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे. 39 मंत्र्यांनी शपथ घेतली असून खातेवाटप अद्याप जाहीर झालेले नाहीत. त्यावर जोरदार रस्सीखेच दिसून येत आहे. त्यात पालकमंत्र्यांवरूनही वाद उफाळून येऊ शकतो. शिवसेनेचे कॅबिनेटमंत्री भरतशेठ गोगावले यांनी कोणतेही खातेही घेऊ पण रायगडचा पालकमंत्री मीच होणार आहे… असे उघडपणे बोलताना सांगितले आहे. राष्ट्रवादीच्या मंत्री अदिती तटकरे याही रायगडचे पालकमंत्रीपदासाठी दावेदार आहेत. त्या रायगडच्या पालकमंत्री होत्या. तर त्यामुळे पालकमंत्र्यांवरून महायुतीत खटके उडतील,अशी परिस्थिती होती.मागील सरकारात राष्ट्रवादीच्या अदिती तटकरे या महिला बालकल्याण विभागाच्या मंत्री होत्या. त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे…तर मागील अडीच वर्षापासून मंत्री बनवण्याचे स्वप्न पाहणारे आमदार भरत गोगावले हेही मंत्री झाले आहेत. आतापर्यंतच्या रायगडच्या राजकीय इतिहासात प्रथमच दोन कॅबिनेट मंत्रिपदे जिल्ह्याला मिळालीत. परंतु आता पालकमंत्रीपदावरून रस्सीखेच होणार आहे कारण अदिती तटकरे या पालकमंत्री असताना त्यांना शिंदे गटातील आमदारांनी तीव्र विरोध केला होता. त्यावरून खासदार सुनील तटकरे आणि गोगावले यांच्यामध्ये जोरदार राजकीय वाद झाला होता. त्यामुळे रायगडचे पालकमंत्रीपदही कळीचा मुद्दा आहे. खाते आणि पालकमंत्रीपदाबाबत गोगावले म्हणाले, मला एकनाथ शिंदेसाहेब जे खाते देतील ते मान्य राहील. पण मला माझ्या जिल्ह्याचे पालकमंत्रिपद पाहिजे आहे. त्याचा विचार केला जाईल.