मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत अलिबागमध्ये होणार लवकरच पक्षप्रवेश…शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्याला लागले भाजपचे वेध…

0
42

अलिबाग शिवसत्ता टाइम्स (अमूलकुमार जैन):-

रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यामध्ये येत्या काही दिवसांतच भारतीय जनता पक्षाचा प्रवेश सोहळा मोठ्या दिमाखात पार पडणार आहे. या पक्ष प्रवेश सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासहित भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातील वरिष्ठ पदाधिकारी व मंत्री उपस्थित राहणार असल्याची माहिती सुत्रांद्वारे प्राप्त झाली आहे…रायगड जिल्ह्यातील शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांचा भाचा, महाराष्ट्र शासनाच्या मत्सयव्यवसाय विभागाच्या राज्यमंत्री कै. मीनाक्षी पाटील यांचे पुत्र. व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष ॲड. आस्वाद पाटील उर्फ पप्पुशेठ यांनी आपल्या समर्थकांसोबत अलिबाग शहरातील रविकिरण हॉटेलमध्ये चर्चा करण्यासाठी १० डिसेंबर २०२४ रोजी रात्री उशिरा सभा घेतली होती…या सभेत आस्‍वाद पाटील यांनी पक्षाचा राजीनामा देत असल्‍याचे जाहीर केले होते. त्यानंतर रात्री उशिरा शेतकरी कामगार पक्षाच्या जिल्हा चिटणीस पदाचा व सदस्य पदाचा राजीनामा हा पक्षश्रेष्ठींकडे पाठवून दिला होता. जिल्हा परिषद माजी अध्यक्ष आस्वाद पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर पाटील कुटुंबीयांमधील वाद चव्हाट्यावर आल्याचे दिसून आले होते.नोव्हेंबर २०२४ मध्ये झालेल्या सार्वत्रिक विधानसभा निवडणुकिवेळी पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांच्या स्नुषा चित्रलेखा पाटील या शेकापच्‍या उमेदवार असतानाही त्‍यांचे भाचे आस्‍वाद पाटील, बंधू माजी आमदार पंडित पाटील हे प्रचारापासून दूर राहिले. निवडणूकीपूर्वीच त्‍यांनी चित्रलेखा पाटील यांच्‍या उमेदवारीला विरोध केला होता. या निवडणूकीत चित्रलेखा पाटील यांना पंचवीस हजारहुन अधिक मतांनी पराभवाला सामोरे जावे लागले होते.आस्वाद पाटील यांनी अलिबाग मुरुडचे आमदार तथा महायुतीचे उमेदवार महेंद्र दळवी यांना, छुपी मदत केल्याने चित्रलेखा पाटील यांचा पराभव झाला असल्याचीदेखील चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. कारण शेकापच्या काही मंडळींनी माजी मंत्री रविंद्र चव्हाण यांची भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदी नियुक्त झाल्यानंतर त्यांचे अभिनंदन सोशल मीडियाद्वारे केले होते…विधानसभा निवडणूकीचा माहोल संपल्‍यानंतर आता शेकापमधील पाटील परिवारातील वाद हा उघडपणे चव्हाट्यावर आल्याचे दिसून आले…