रायगड शिवसत्ता टाइम्स (प्रवीण पाटील):-
रखडलेल्या पालकमंत्रीपदावर अखेर शिक्कामोर्तब झाले. काही वादग्रस्त जिल्ह्यात कोणाला पालकमंत्रीपद मिळणार अशा यादीत रायगडचा देखील नंबर होता. चौथ्यांदा निवडून आलेले भरत गोगावले आणि याआधी पालकमंत्रीपद भूषविलेल्या अदिती तटकरे यांच्यात मागील काही दिवसांपासून पालकमंत्रीपदासाठी रस्सीखेच सुरू होती. अखेर पालकमंत्रीपदाची माळ जिल्ह्यात एकमेव राष्ट्रवादीची जागा असलेल्या आदिती तटकरेंच्या गळ्यात पडल्याने भरत गोगावले यांच्यासह समर्थकांमध्ये नाराजी पसरल्याचे चित्र आहे. भरत गोगावले यांचे पुन्हा पालकमंत्री होण्याचे स्वप्न अपूर्ण राहिल्याने सुनील तटकरे यांनी आपले वजन जिल्ह्यात अधिक असल्याचे पुन्हा एकदा दाखवून दिलंय.शिंदे सरकारच्या काळात सरकार स्थापनेपासून रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावर वाद सुरू होता. या वादात उदय सामंत यांच्या गळ्यात रायगडच्या पालकमंत्रीपदाची माळ पडली होती. आता पुन्हा फडणवीस सरकारमध्ये भरत गोगावले यांनाच पालकमंत्रीपद मिळेल, अशा चर्चा सुरु होत्या. अखेर यावर देखील आता पाणी फिरल्याने या पदासाठी अदिती तटकरे पुन्हा एकदा रायगडच्या पालकमंत्रीपदी विराजमान झाल्या आहेत. भरत गोगावलेच पालकमंत्री होतील असा जोरदार दावा शिंदे गटाकडून करण्यात आला होता. मात्र, तटकरे यांची निवड झाल्याने शिंदे गटात नाराजीचा सूर उमटण्याची शक्यता आहे.महाविकास आघाडी सरकार काळात आमदार म्हणून शिवसेनेच्या तिन्ही आमदारांनी अदिती तटकरेंच्या विरोधात बंड पुकारून पालकमंत्री हटाव राष्ट्रवादी हटाव मोहीम आखली होती. त्यावेळेपासूनच तटकरे आणि गोगावले यांच्यातील वाद कायम चर्चेत राहिला होता. जिल्ह्यात होणाऱ्या विकासात्मक कामात तटकरे यांच्याकडून शिंदे गटाच्या आमदारांना कमी दर्जा मिळत होता, असा आरोप या आमदारांनी केला होता. या तिन्ही आमदारांनी अदिती तटकरे यांना त्यावेळेस पदावरून पायउतार करण्यास भाग पाडले होते. आता हीच वेळ महायुतीतील या आमदारांवर आली असून पुन्हा अदिती तटकरे यांची वर्णी लागल्याचा स्वीकार करणार की आपली नाराजी कायम ठेवणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.