रायगड शिवसत्ता टाइम्स (धम्मशील सावंत):-
रायगडच्या सत्तेतील आमदार, खासदार हे लोक-निर्वाचित नेते आपापाल्याच संघर्षात व्यस्त असल्याने विकासाच्या विविध योजना कधी निधीअभावी तर कधी या नेत्यांच्या नाकर्तेपणामुळे अद्याप प्रलंबित अवस्थेत आहेत याकडे माजी आमदार पंडित पाटील यांचे लक्षवेधी विधान.रस्ते, पाणी, आरोग्य विषयक योजना निधी अभावी रखडल्या गेल्या आहेत तर ठेकेदाराला बिलेच मिळत नसल्याने त्यांच्यावर देखील आत्महत्या करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने “जलजीवन मिशन योजना” आणि “हर घर पाणी योजना” या शिर्षकांखाली केवळ मार्केटिंग करण्यात आले पण प्रत्यक्षात जनतेच्या पदरात काहीच पडलेले नाही असे पंडित पाटील पुढे म्हणाले.गेल्या पाच महिन्यांपासून रायगड जिल्हा परिषदेकडे जवळपास शंभर कोटींची बिले प्रलंबित असून संपूर्ण योजना पूर्णत्वास नेण्यास चारशे ते पाचशे कोटींची आवश्यकता आहे. त्याचप्रमाणे माणगांव “एमजीबी” कडे सुद्धा जलजीवन मिशन योजना राबवली जाते. त्यांची देखील पाचशे कोटींची मागणी असताना गेले पाच महिने एकही रुपया जलजीवन मिशन करीता मिळाला नसल्याने रायगड जिल्ह्यातील सर्वच जलजीवन मिशन योजना ठप्प पडल्या आहेत. ज्या ठेकेदारांनी स्वतःच्या खिशातील पैसे टाकून योजना पूर्ण केल्या , पण त्यांची बिले न मिळाल्याने त्यांच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे. सत्तेतील खासदार आमदार, मंत्री हे या योजनेला निधी मिळवून देण्यात अथवा या प्रश्नावर राज्य, केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यात ते अपयशी ठरलेले आहेत, हेच दुर्दैव म्हणावे लागेल.