अंधाधुंद निदानाने मुलीला कुष्ठरोगी ठरवीत चुकीची औषधे दिल्याने मृत्यू… आश्रमाकडून चुकीचे निदान व औषधौपचार याबद्दल आई वडिलांना ठेवले गाफील…

0
43

पेण शिवसत्ता टाइम्स (देवा पेरावी):- 

रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील वरवणे येथील शासकीय आश्रमशाळेतील चौथीमध्ये शिकणाऱ्या आदिवासी विद्यार्थिनीचा मृत्यू झाला आहे…पूर्वी कोणताही आजार नसलेली खुशबू नामदेव ठाकरे या चौथी इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला कुसुम योजनेअंतर्गत  कुष्ठरोगी ठरविण्यात आले…मुलीच्या पालकांना याबाबत आरोग्य विभाग व आश्रमशाळेच्या माध्यमातून देखील कळविले नाही…
दरम्यान चुकीची औषधे घेतल्याने आपल्या मुलीच्या अंगावर फोड्या आल्या… तिचे हातपाय सुजले आणि अंत्यवस्थ झाली असून, तिच्या मृत्यूस शासकीय आदिवासी आश्रमशाळा तसेच आरोग्य विभाग दोषी असून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पालकांनी केली आहे…पेण तालुक्यात वरवणे येथे असलेल्या शासकीय आश्रमशाळेमध्ये तेथील कामार्ली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आय.पी.एच.एस.उपकेंद्र वाकरुळ यांनी शासनाच्या कुसुम योजना अंतर्गत १६ डिसेंबर २०२४ रोजी शिबीर घेतले होते…
महाराष्ट्र शासन आरोग्य सेवा अंतर्गत राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम १६ डिसेंबर २०२४ रोजी कुष्ठरोग सुरक्षित महाराष्ट्र-कुसुम अभियान यांच्यावतीने शासकीय माध्यमिक आश्रम शाळेमधील निवासी शिक्षण घेत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांची तपासणी केली गेली…यावेळी इयत्ता चौथीमध्ये शिकत असलेली खुशबू नामदेव ठाकरे या विद्यार्थिनीच्या अंगावर तिन चट्टे असल्याने तिला कुष्ठरोगी असल्याचे निदान केले गेले…त्याबाबतची माहिती देणारे पत्र आरोग्य विभागाकडून दि.१६ डिसेंबर दरम्यान शासकीय आश्रमशाळेला देण्यात आले नाही… पेण तालुक्यातील बोरगांव ग्रामपंचायत मध्ये असलेल्या तांबडी आदिवासीवाडी मधील रहिवाशी असलेली खुशबू ठाकरे या चौथी मधील विद्यार्थिनीला कुष्ठरोगी ठरवण्यात आले…त्याबाबत त्या मुलीच्या पालकांना कल्पना देणे आणि त्यांचा सल्ला घेणे आवश्यक असताना प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा शासकीय आश्रमशाळा यांच्याकडून कोणत्याही प्रकारची खबरदारी घेतली गेली नाही…प्राथमिक आरोग्य केंद्राकडून कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम-अंतर्गत कुष्ठरोगी ठरविण्यात आलेल्या खुशबू नामदेव ठाकरे या मुलीला कुष्ठरोग निर्मूलन बाबत गोळ्या १८ डिसेंबर पासून सुरु करण्यात आल्या…तपासणी शिबीर आणि गोळ्या सुरु झाल्यानंतर २८ डिसेंबरपर्यंत नामदेव ठाकरे यांना आपल्या मुलीला कुष्ठरोगी ठरविण्यात आले आहे, याबाबत कोणतीही माहिती नव्हती…खुशबू ठाकरे हिची मोठी बहीण याच शाळेत शिकत होती आणि ती सहलीसाठी जात असल्याने तिला भेटण्यासाठी नामदेव ठाकरे आश्रमशाळेत आल्यावर खुशबू आजारी असल्याचे कळले… खुशबू ठाकरे ही चौथीमध्ये शिकत असलेल्या आपल्या मुलीला ताप येत असल्याने तिला नामदेव ठाकरे यांनी आपल्या घरी तांबडी येथे नेले…घरी नेल्यावर शाळेतून देण्यात आलेल्या गोळ्या तिचे पालक देत होते… मात्र त्या कसल्या गोळ्या आहेत याची पुसटशी कल्पना देखील नामदेव ठाकरे यांच्या कुटुंबाला नव्हती…दि.३ जानेवारी रोजी सदर पालकांनी आपल्या मुलीला पुन्हा आश्रमशाळेत नेऊन सोडले…मात्र कोणताही आजार नसलेल्या मुलीला कुष्ठरोगाच्या गोळ्या दिल्या जात असल्याने त्याचा साईड इफेक्ट खुशबू ठाकरे हिच्या शरीरावर दिसून येऊ लागला…तिच्या अंगावर फोड्या उठल्या तसेच हात पाय यांना सूज येऊ लागली…ही बाब दि. १० जानेवारी नंतर खुशबूच्या अंगावर दिसून येऊ लागल्यावर नामदेव ठाकरे यांना आश्रमशाळेत बोलावून घेण्यात आले आणि त्यावेळी पालकांच्या सोबत खुशबू हिला पेण ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, त्यावेळी शासकीय आश्रमशाळेचे शिक्षक तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते…तेथे खुशबू हिची प्रकृती गंभीर असल्याने पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात नेण्यास सांगितले… पनवेल येथे १६ जानेवारी रोजी नेण्यात आल्यानंतर तेथील वैद्यकीय अधिकारी यांनी कुष्ठरोगाच्या गोळ्या कोणी दिल्या असे विचारून त्या तात्काळ बंद करण्याच्या सूचना दिल्या…सदर गोळ्या शासकीय आश्रमशाळेतील महिला अधीक्षिका सुवर्णा वरगने यांच्याकडून दिल्या जात होत्या… मात्र त्यांनी आणि आश्रमशाळेचे मुख्याध्यापक अजित पवार यांच्याकडून पालकांना तुमची मुलगी कुष्ठरोगी आहे याची कल्पना दिली नव्हती…दि.१६ जानेवारीपासून पनवेल येथील एमजीएम रुग्णलयात उपचार घेत असलेली खुशबू हिचा २२ जानेवारी रोजी मृत्यू झाला…याप्रकरणी आदिवासी विकास विभागाच्या पेण प्रकल्प अधिकारी कार्यलयाने दुसऱ्याच दिवशी वरवणे येथील शासकीय आश्रमशाळा मुख्याध्यपक आणि अधीक्षिक यांना कारणे दाखवा नोटीस बजावली… परंतु त्या कारणे दाखवा नोटिसीला तिन दिवसात कोणतेही उत्तर देण्यात आले नव्हते…परंतु प्रकल्प अधिकारी कार्यलयाने शासकीय आश्रमशाळा मुख्याध्यापक आणि अधिक्षक यांच्यावर आजपर्यंत कोणतीही कारवाई केलेली नाही… त्यातून प्रकल्प अधिकारी आत्माराम धाबे हे देखील एका निरपराध मुलीच्या मृत्यूचे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून येत आहेत… या दुर्दैवी मुलीचे वडील नामदेव ठाकरे यांनी याबाबत अधिक स्पष्टीकरण देताना सांगितले कि, आमच्या मुलीला कोणताही आजार झालेला नव्हता तिच्या चेहऱ्यावर असलेले डाग हे जन्मापासूनच होते… कुष्ठरोगाचे नव्हते, त्यामुळे शासनाच्या कुष्ठरोग सुरक्षित महाराष्ट्र कुसुम अभियान यामुळे एका निरपराध मुलीला कुष्ठरोगी ठरविण्यात आले… त्यात आपली मुलगी कुष्ठरोगी आहे आणि खुशबू हिच्या लिव्हरमध्ये आलेली सूज तसेच अंगावरती सूज चुकीच्या उपचारांचे परिणाम होते… परंतु तुमच्या मुलीला कुष्ठरोगी ठरवण्यात आले आहे हे मला मुख्याध्यापक किंवा अधीक्षिका यांनी सांगितले नाही… ते सांगण्याची तसदी शासकीय आश्रमशाळेने घेतली नाही आणि त्यामुळे माझ्या मुलीच्या मृत्यूस आश्रम शाळेचे मुख्याध्यपक आणि अधीक्षिका हे जबाबदार आहेत आणि त्यांच्यावर शासनाने कारवाई करावी… याबाबत कर्जतचे आदिवासी कार्यकर्ते जैतू पारधी म्हणाले…  संपूर्ण महाराष्ट्रभर कुष्ठरोग सुरक्षित महाराष्ट्र अभियान ही योजना खरं तर या आजाराला रोखण्यासाठी राबवली जाणारी मोहीम असून या मोहिमेतून कुष्ठरोगाचे संशयित रुग्ण शोधून त्यांना उपचार उपलब्ध करून देणे हे उद्दिष्ट आहे. परंतु कुष्ठरोग नसलेल्यांना उपचार करून कुसुम अभियानाला गालबोट लागल्याचे दिसून येत आहे… त्यामुळे खुशबूच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या प्रत्येकाची शासनाने चौकशी करावी आणि त्यांच्यावर कारवाई व्हावी…. अजित पवार – मुख्याध्यापक शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, वरवणे म्हणाले कि, आमच्या शाळॆत कुष्ठरोग निर्मूलन बाबत शिबीर झाले आणि त्यात एका मुलीला नसतानाही कुष्ठरोगी ठरवले गेले… तद्नुसार प्राथमिक आरोग्य केंद्राकडून देण्यात आलेल्या गोळ्या आमच्या अधीक्षिका यांच्याकडून दररोज देण्यात येत होत्या. तसेच त्या मुलीला ताप आल्यावर आम्ही वाकरूळ येथे असलेल्या प्राथमिक आरोग्य उप केंद्रात नेले…
सुवर्णा वरगने, अधीक्षक शासकीय आश्रमशाळा वरवणे, आत्माराम धाबे – प्रकल्प अधिकारी पेण, डॉक्टर नेत्रा पाटील वैद्यकीय अधिकारी, कामार्ली प्राथमिक आरोग्य केंद्र या सर्वांनी देखील याप्रकरणी आपापल्या अशाच अर्थाच्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत…