रोहा शिवसत्ता टाइम्स (अक्षय जाधव):-
साऱ्या जगाला पंढरपूर वारीचे वेध आहे…. त्याचप्रमाणे सातारा जिल्ह्यातील लोणंद, वाई तसेच जेजुरी, सासवड येथून आपल्या कुटुंब कबिल्यासह रोह्याचे ग्रामदैवत श्री धावीर महाराजांच्या वारीला येण्याची दोनशे वर्षांपासूनची परंपरा आहे….
लोणंद येथील भाविक रवि लाखे आणि त्यांच्या पत्नी सौ. सुनीता रवि लाखे यांनी रोह्याचे ग्रामदैवत श्री धावीर महाराज यांच्या दर्शनासाठी लोणंद ते रोहा अशी १८२ किमीची पदयात्रा शनिवारी सायंकाळी पूर्ण केली… ३१ जानेवारी ते ६ फेब्रुवारी दरम्यान आठ दिवसांच्या श्री धावीर महाराज पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते… रोह्याच्या प्रवेशद्वारावर देवस्थानचे उपाध्यक्ष नितीन परब, खजिनदार महेश सरदार, विश्वस्त संदीप सरफळे, महेश चाळके, समीर साळवी, राहुल मोहिते, विशाल शेलार, शैलेश रावकर, भरत गुरव, दिनेश मोहिते आदींनी लाखे उभयतांचे स्वागत केले….
पूर्वी दरवर्षी वारी करणारे हे भक्तगण एकोणीसशे सत्तर-बहात्तर सालानंतर दर तीन वर्षांनी देवाची जत्रा साजरी करण्यासाठी माघ पौर्णिमेला श्री धावीर मंदिरात येतात…. पूर्वी हे लोक जेजुरी – सासवड-कोंढणपूर- पानशेत- लिंग्याचा घाट ताम्हिणी घाट ते कोलाडमार्गे रोहा असा पायी प्रवास करीत असत…. परंतु आता स्वतःच्या वाहनातून येतात… आज एकेका तांड्या बरोबर चारशे ते पाचशे भाविक असतात…. देवाच्या कृपेने घरात सुबत्ता आली आहे, पण देवावरील भाव तिळमात्र कमी झालेला नाही…. यातील बरेच लोक मोठमोठ्या सरकारी हुद्द्यावर काम करत आहेत…. काहींचे स्वतःचे उद्योग आहेत…. स्वतःची आलिशान घरे आहेत, पण श्री धावीर महाराजांच्या वारीला आल्यावर परंपरेने साध्या राहुटी मध्ये (झोपडीमध्ये) राहतात…. जेजुरी वरून येणारे वारकरी खंडेरायाच्या पालखीचे मानकरी आहेत….