पेण शिवसत्ता टाइम्स (देवा पेरवी):-
शेकापचा विकासाला विरोध नाही मात्र शेतकऱ्यांचा, भूमिपुत्र यांचा हक्क त्यांना मिळालाच पाहिजे, अशी शेतकरी कामगार पक्षाची पहिल्या पासूनची भूमिका असल्याचे मत शेकाप नेते भाई जयंत पाटील यांनी पेण येथील कार्यकर्ता संवाद मेळाव्यात बोलतांना व्यक्त केले… तर अतुल म्हात्रे हे पेणकरांसाठी वरदान ठरणार असल्याचेही जयंत पाटील यांनी सांगितले…. तालुक्यातील शेकाप कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा पेण शहरातील आगरी समाज सभागृहात आयोजित करण्यात आला होता… यावेळी व्यासपीठावर माजी आमदार बाळाराम पाटील, शेकापक्षाचे खजिनदार अतुल म्हात्रे, रायगड जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सुप्रिया पाटील, रायगड जिल्हा चिटणीस सुरेश खैरे, महिला आघाडीच्या प्रमुख मानसी म्हात्रे, पी.डी.पाटील, प्रकाश शिंगरूत, मोहिनी गोरे, माजी सभापती सुनंदा म्हात्रे आदीसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते…
यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना भाई जयंत पाटील म्हणाले कि, रायगड जिल्ह्यात तिसरी मुंबई उभारली जात आहे… जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांच्या जमीनीवर हा प्रकल्प उभारला जाणार आहे…. शेतकऱ्यांच्या जागा कवडी मोल भावाने विकत घेऊन उद्योजकांना विकण्याचा डाव आहे… आमचा विकासाला विरोध नाही मात्र शेतकऱ्यांचा, भूमिपुत्र यांचा हक्क त्यांना मिळाला पाहिजे, अशी आमची भूमिका असल्याचे जयंत पाटील यांनी म्हटले… प्रकल्पला विरोध करतील त्याला मकोका लावणार ही मुख्यमंत्री यांची भूमिका निंदनीय आहे… आम्ही हप्ते मागत नाही, जेथे अन्याय असेल तेथे आम्ही विरोधच करू असे पाटील यांनी ठणकावले…
महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या विजयात डाव्या आघाडीचा मोठा वाटा आहे… मात्र विधानसभा निवडणुकीत आयत्यावेळी फसवले… अलिबाग, पेण व पनवेलच्या जागा सोडली असा शब्द संजय राऊत यांनी दिला होता…तसे मीडियामध्ये जाहीरही केले होते नंतर शब्द फिरवला, असा आरोप जयंत पाटील यांनी यावेळी केला… पेणमध्ये जो आमदार शेकापने केला तो पक्ष सोडून गेला… 57 साली गोविंद कातकरी आमदार झाले, 67 साली भाई शेट्ये निवडून आले 71 साली काँग्रेसमध्ये गेले… 71 साली मोहन पाटील काँग्रेसमध्ये गेले 77 साली परत पक्षात आले… ज्या घरात शेकापने पन्नास वर्षं आमदारकी दिली त्यांनी गद्दारी केली… राजकारणात अशा दल बदलूना स्थान नाही, अशी टीका विद्यमान खासदार धैर्यशील पाटील यांचे नाव न घेता जयंत पाटील यांनी केली… भाजपा हा पक्ष मूळ भाजपा राहिला नाही… भाजपामध्ये पन्नास टक्के काँग्रेसची मंडळी आहेत… उद्याचा दिवस आपला आहे, पुन्हा पक्ष उभा करणार, गद्दारांना धडा शिकवणार असा विश्वास जयंत पाटील यांनी यावेळी व्यक्त केला… यावेळी महिला अध्यक्ष मानसी म्हात्रे, खजिनदार अतुल म्हात्रे व जिल्हा चिटणीस सुरेश खैरे यांनी देखील आपले विचार मांडले…
आपल्या पक्षाचे खजिनदार अतुल म्हात्रे यांच्या रूपाने आपल्या पेणला एक प्रकारे वरदान लाभले आहे… पेण आणि उरण येथे होणाऱ्या तिसऱ्या मुंबईत आपल्या शेतकऱ्यांसाठी आणि प्रकल्पग्रस्तांसाठी त्यांचे मोलाचे योगदान आपल्याला लाभणार आहे… आपण सर्वांनी मिळून अतुल म्हात्रे यांना पाठबळ द्या आणि ठेकेदार म्हणून काम करणाऱ्यांना दुर ठेऊन एकदिलाने काम करा असेही जयंत पाटील यांनी उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले…