महानगर सीएनजी सब स्टेशन सुविधा की दुविधा ?… बेशिस्त वाहन पार्किंग देतात अपघाताला निमंत्रण…

0
38

खोपोली शिवसत्ता टाइम्स (खलील सुर्वे):- 

खालापूर तालुक्यातील सावरोली ग्रामपंचायत हद्दीत रायगड जिल्ह्यातील अधिकृत डिलरपर्यंत सीएनजी पोहचविण्यासाठी महानगर गॅस कंपनीने सीएनजी सब स्टेशन सुरू केले आहे… परंतु हे सब स्टेशन वाहन चालकांसह आजूबाजूच्या नागरिकांसाठी मृत्यूचा सापळा ठरू पाहत आहे… सुरक्षा नियमांची पायमल्ली होत असल्याने भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही… हे सब स्टेशन अलिबाग, पेण, सुधागड, खालापूरसह ‘एक्सप्रेस वे’ एक्झिटला असल्याने या मार्गांवरून वाहनांची मोठी वर्दळ असते… तसेच एमआयडीसीकडे जाणारा मार्ग असल्याने मोठी वाहने या मार्गांवरून मार्गक्रमण करीत असतात… त्यातच पेण-सुधागडकडून येणारा इंडीया बुल्स गल्फ सिटी समोरील रस्ता उतारावर असल्याने वाहने वेगाने येत असतात… परंतु सीएनजी वाहतूक करणारे मोठ-मोठे टँकर रस्त्यावर, रस्त्याच्याकडेला तसेच एक्सप्रेस वे एक्झिट मार्ग अडवून उभे राहत असल्याने अपघाताला निमंत्रण मिळत असते… या ठिकाणी नेहमीच लहान-मोठे अपघात होत असतात…

मागील आठवड्यात एका टँकरला आग लागली होती. हा टँकर सीएनजी सब स्टेशनपासून काही अंतरावर होता तसेच त्याच्यावरून हायटेन्शन लाईन सुध्दा गेली होती. सुदैवाने मोठी दुर्घटना होण्यापूर्वी आग विझविण्यात आली. तत्पूर्वी एक अपघात झाला होता, त्यातील जखमी अद्याप कोमात असल्याचे समजते. ऐवढेच नव्हे तर सब स्टेशनच्या बाहेरच एक टपरी असून त्यात नाश्त्याची सुविधा मिळते. परंतु या सब स्टेशनमध्ये गॅस भरतांना कधी-कधी लिकेज होते. टँकरला आग लागली त्याच काळात सीएनजी भरताना व्हॉल्वमधून गॅस लिकेज झाला होता. हा गॅस या चहा टपरीवरील सिलेंडर व आगीच्या संपर्कात आला असता तर काय झाले असते ? याचा विचार न केलेलाच बरा…तसेच सब स्टेशनपासून काही अंतरावर सावरोली ग्राम पंचायतीचा कचरा डेपो असून येथील कचरा पेटवून दिला जातो. वाऱ्याच्या वेगात या डेपोतील आग सब स्टेशन परिसरात पसरली तर…विचार न केलेलाच बरा.

सीएनजी सब स्टेशनमधील गॅस संपूर्ण रायगडात वाहून नेण्यासाठी 70-80 वाहने आहेत… ही वाहने पार्कींग यार्ड नसल्याने बेशिस्तपणे उभे राहत असल्याने अपघाताला निमंत्रण मिळत आहे… त्यामुळे पार्कींग यार्डची व्यवस्था करणे आवश्यक आहे… तसेच सब स्टेशन परिसरात अँब्युलन्स, फायर वाहन देखील महत्वाचे आहे, परंतु तसे कुठेच दिसत नसल्याने 5 -10 किमी अंतरातील नागरीक मृत्यूच्या छायेत जगत असल्याचे दिसून येत आहे. या सब स्टेशनमधील वाहनात एलएनजी (LNG) असतो, हा अडीच पट अधिक कार्यान्वीत होतो. यामध्ये असलेला 100 किलो गॅस अडीच पट अधिक कार्यान्वीत झाल्यास 5 -10 किमी परिसर आगीच्या संपर्कात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, रायगड जिल्हा प्रशासनासह खालापूर तहसिलदार, कर्जत प्रातांधिकारी, खालापूर पोलिस याचा पाठपुरावा करणार का? पेट्रोलियम मंत्रालय या सुरक्षा उदासिनतेवर लक्ष देणार का? की मोठा अपघात झाल्यानंतर उपाययोजना आणि कारवाईचा बडगा उगारला जाणार.