कृषी क्षेत्रात ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांचे जीवनमान सर्वंकष उंचावणार : कृषीमंत्री ॲड. कोकाटे

0
35

अलिबाग शिवसत्ता टाइम्स (धनंजय कवठेकर) :-

शेतकऱ्यांचे जीवनमान अधिकाधिक समृद्ध करण्यासाठी कृषी क्षेत्रात सातत्याने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे आहे…. राज्य शासन शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविण्याबरोबरच त्यांच्या उत्पादन खर्चात बचत करण्यासाठी येत्या काळात कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (‘एआय’चा) वापर करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन कृषीमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी केले…

कृषिमंत्री श्री.कोकाटे यांच्या संकल्पनेतून प्रगतशील व प्रयोगशील शेतकरी परिसंवादाचे आयोजन विभागीय पातळीवर करण्यात आले. या अंतर्गत कोकण विभागातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी संवाद आणि चर्चा कार्यक्रमाचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे करण्यात आले होते… यावेळी ते बोलत होते. मार्गदर्शन करताना ॲड.कोकाटे म्हणाले, शेतकरी केंद्रस्थानी ठेवून कामकाज होण्यासाठी समस्या, अभिप्राय तसेच सूचना विचारात घेऊन कृषी विभागात शेतकरीभिमुख कामकाजासाठी बदल करण्यात येत आहेत… शेतकरी व कृषी विभागाची सांगड घालून भविष्यात कृषी क्षेत्रात मोठया प्रमाणावर प्रगतीच्या संधी उपलब्ध होतील… कृषी विद्यापीठ यांनी केलेले प्रयोग, विकसित केलेले तंत्रज्ञान, हवामान बदल, पीक पद्धती याची माहिती तात्काळ शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी प्रभावी कार्यपद्धती वापरावी…. समाज माध्यमे, विविध संदेश वहनाची साधने वापरावी तसेच शेतकऱ्याशी सातत्याने संवाद ठेवावा…. कृषी विभागाची कार्यपद्धती अधिक प्रभावी होण्याच्या अनुषंगाने तसेच कृषी धोरण बनविताना शेतकऱ्यांच्या अडचणी, समस्या तसेच सूचना व प्रस्ताव यांचा समावेश करण्याच्या उद्देशाने या संवाद चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे….

रासायनिक खतांच्या वापरातून मानवी आरोग्यावर होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानासह सेंद्रिय शेतीकडे वळावे, असे आवाहन करून राष्ट्रीय सेंद्रिय सह.संस्थेच्या माध्यमातून सेंद्रिय मालाला हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही ॲड. कोकाटे यांनी यावेळी सांगितले….