महाड शिवसत्ता टाइम्स (निलेश लोखंडे):-
खाडीपट्टा हा दुर्गम आणि ग्रामीण पट्टा असून येथील २१ गावातील नागरिकांना गेली तीन दशके खैरे धरणाच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र येथील नागरिकांकडून खैरे धरणाचे हे पाणी मोफत मिळाले पाहिजे यासाठी प्रयत्न करणार असून पाणीपट्टी माफ करण्यासाठी माझे प्रयत्न असतील असे कॅबिनेट मंत्री नामदार भरत गोगावले यांनी खाडीपट्टयातील खैरे येथील जलशुद्धीकरण केंद्राच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी खाडीपट्टा वासियांसमोर बोलताना आश्वासन दिले…
खैरे येथील जलशुद्धीकरण केंद्राचे लोकार्पण नामदार भरत गोगावले यांच्या हस्ते केल्यानंतर त्यांनी स्वतः तेथील पाणी प्राशन केले. यावेळी रोहन येथे एका छोटेखानी सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर नामदार भरत गोगावले यांच्यासह महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता प्रशांत भामरे, कार्यकारी अभियंता हेमंत नागदे, उपअभियंता प्रशांत पांढरपट्टे, नायब तहसीलदार, जल जीवन मिशन योजना ठेकेदार रेडकर, राजीप माजी सदस्य जितेंद्र सावंत, पंचायत समिती माजी उपसभापती शुहेब पाचकर, महाड तालुका संपर्क प्रमुख इक्बाल चांदले, महाड विधानसभा संघटक एकनाथ सुकुम, विभाग प्रमुख कृष्णा सुकूम तसेच उद्योगपती सिताराम उभारे यांच्यासह खाडीपट्टा शिवसेनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते…
या योजनेतील मुख्य जबाबदारी असणाऱ्या जिल्हा परिषद अधिकारी यांच्याकडून नागरिकांची पिळवणूक होत असून अशा अधिकाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल असे सांगून यापूर्वी गढूळ पाण्याचा पुरवठा होत होता, मात्र आजपासून सगळ्यांना स्वच्छ जल पुरवठा होईल. भविष्यात खैरे धरणातील गाळ काढण्यासाठी भरीव निधी मंजूर करण्याचा प्रयत्न करेन असे देखील नामदार भरत गोगावले यांनी आश्वासन देऊन राष्ट्रीय महामार्गाचे काम देखील तत्परतेने सुरू आहे ते देखील लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा केला जाईल असा विश्वास त्यांनी उपस्थित शेकडो नागरिकांना यावेळी दिला…
पंचायत समिती माजी उपसभापती शुहेब पाचकर यांनी देखील या योजने अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी यासाठी आपल्या तुफान फटकेबाजी भाषणाला सुरुवात करून जल जीवन मिशनचे काम आतापर्यंत ७० टक्के पूर्ण झाले असून उर्वरित काम मे महिन्यापर्यंत पूर्ण होईल असे आश्वासन देऊन सुमारे ३२ कोटी निधीची ही योजना नामदार भरतशेठ गोगावले यांनी आपल्यासाठी मंजूर करून घेतली याबद्दल नामदार गोगावले यांचे आभार व्यक्त केले. जलशुद्धीकरण केंद्राचे आज लोकार्पण झाले असले, तरी ही योजना पुढे जिल्हा परिषद राबवणार असल्याने जिल्हा परिषदेचे देखभाल दुरुस्ती ठेकेदार यांचे या योजनेवर पूर्ण दुर्लक्ष झाले असून कोणतेही काम त्यांच्याकडून होत नसल्यामुळे त्यांची तात्काळ हकलपट्टी करावी अशी नामदार गोगावले यांच्याकडे पाचकर यांनी मागणी केली. उपविभाग प्रमुख शितल विचारे यांनी उपस्थितांचे आभार मानले…