पेण शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-
रायगडच्या पेण तालुक्यातील बेणसे सिध्दार्थनगर गावाच्या लगत आज अचानक आगीने पेट घेतला. बघता बघता आगीने रौद्र रूप धारण केले. गावाला अग्नी तांडवाने घेराव घातल्याने गावकरी भयभीत झाले. समय सुचकता राखत आपापल्या परीने ग्रामस्थ व तरुणांनी उपलब्ध पाण्याच्या वापराने आग विजविण्यासाठी प्रयत्न केला…मात्र कडाक्याचे उन्ह व पालापाचोळा यांनी पेट घेतला. आग नियंत्रणाबाहेर गेल्याने तातडीने रिलायन्स कंपनी कडून अग्निशमन बंब बोलविण्यात आले. यावेळी आलेल्या फायर ब्रिगेडच्या साहाय्याने आगीवर नियंत्रण आणण्यात आले. या आगीच्या घटनेत ग्रामस्थ व फायर ब्रिगेडच्या मदतीने अनर्थ टळला , मात्र या आपत्तीत अनेक प्रश्न उभे राहिले. आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अस्पष्ट आहे. मात्र भविष्यात एखादी आपत्ती अथवा दुर्घटना घडली तर यावेळी फायर ब्रिगेडचे वाहन मदतकार्य करण्यास कुठून आणावे हा प्रश्न निर्माण झाला आहे.
आपत्ती काळात फायर ब्रिगेड वाहन व रुग्णवाहिका येण्या जाण्यासाठी मार्ग उपलब्द व्हावा अशी मागणी बेणसे झोतीरपाडा स्थानिक प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे पदाधिकारी व स्थानिक ग्रामस्थ करीत आहेत. अशातच रिलायन्स नागोठणे नव्या प्रकल्पाची संरक्षण भिंत झाल्यास आजच्या सारखी आग अथवा सिलेंडर स्फोट ची घटना घडल्यास फायर ब्रिगेडचे वाहन गावात कुठून येणार? तातडीचे मदतकार्य कसे केले जाईल याचा रायगड जिल्हाधिकारी व आपत्ती व्यवस्थापन , रिलायन्स व्यवस्थापन यांनी विचार करावा असे आवाहन करण्यात आलंय…बेणसे बौद्धवाडीलगत संरक्षण भिंत उभारताना आपत्ती काळात मदतकार्य करणारे अग्निशमन बंब, रुग्णवाहिका जन्य येण्यासारखा मोठा रस्ता देण्यात यावा अशी जोरदार मागणी बेणसे सिद्धार्थनगर ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी केली आहे