चौक शिवसात टाइम्स (अर्जुन कदम):-
कोयना पुनर्वसनाच्या ६६ वर्षा नंतर देखील कोयना जांब्रुक वावंढळ या गावाने शिमगा सणाच्या रूढी परंपरा कायम जपल्या आहेत. सातारा जिल्ह्यातील कोयना प्रकल्पामुळे अनेक गावे विस्थापित झाली. रायगड,ठाणे,पालघर,रत्नागिरी, सांगली, सोलापूर तर काही सातारा जिल्ह्यात गेली. कोयना नदीच्या काठावर व सह्याद्रीच्या कुशीत जांब्रुक हे गाव होते. अतिशय निसर्ग रम्य वातावरण, मे महिन्यात देखील थंडगार वातावरण.वाघ, अस्वल, मोर यांच्या सानिध्यात राहणारी माणसे आज खालापूर तालुक्यातील वावंढळ या गावी स्वखर्चाने वसली आहेत. अद्यापही नागरी सुविधा,पर्यायी जमीन,नोकरी या पासून वंचित असली तरी आपली रूढी परंपरा जोपासण्याचे कार्य करत आहेत. ६६ वर्षापूर्वी कै. जयसिंगराव तथा जे.आर.कदम यांनी कल्पक नजरेतून ही वसाहत साकारली आहे.१९५८ साली आपले गाव,झाडे, जमीन सोडताना आपल्या मूळच्या गावाला शेवटचा नमस्कार करण्यास पूर्ण गाव सीमेवर जमला असता सह्याद्री जोरजोराने रडत होता, याचे साक्षीदार आजही जिवंत असून तो प्रसंग सांगताना अंगावर काटा उभा राहतो.पायवाटेने चालणे शक्य नव्हते, त्या ठिकाणाहून अखंड दगडी खांब वावंढळ या ठिकाणी आणून मंदिर उभे केले. या गावात जुन्या गावच्या पाषाण मूर्ती आणल्यावर गाडी एका जागेवर येऊन बंद पडली, काही केल्या सुरू होईना,देवाला याच ठिकाणी वास्तव्य करायचे असेल अशी समजूत झाली, आणि गाडीतून मूर्ती खाली घेतल्या आणि गाडी सुरू झाली, आणि त्याच जागेवर मंदिर उभे राहिले. जुन्या गावात जी रूढी परंपरा होती ती आजही जोपासली जाते. पौर्णिमेच्या पहाटे भद्रेचा होम पेटविला जातो. गावातील लहान मुले, स्त्रिया सकाळीच मंदिरात येतात. होळीच्या सभोवताली पालखी नाचते, नंतर सानेवर बसते.गावातील प्रत्येक कुटुंबाकडून ओटी भरली जाते. त्या नंतर गाव बैठक होऊन वर्षभरातील जमा खर्च याचे वाचन केले जाते, न्याय निवाडा या बैठकीत होतो.६६ वर्षात कुठल्याच पोलीस ठाण्यात गावची तक्रार नाही. दिवसभर पालखी सानेवर बसून राहते. दुसऱ्या दिवशी सकाळी गावदेवीच्या भेटीला जाते, त्या नंतर प्रथम पालखी ज्या ठिकाणी विसावते त्याच ठिकाणी जाते. पालखी बसते त्या ठिकाणी विसावा घेते, मारुती मंदिर, गुरू बाबा समाधी येथे जाऊन प्रथम मानकरी यांच्या घरी पूजा केली जाते, पुन्हा मंदिरात येऊन काही काळासाठी स्थानापन्न होते. मग गावातील प्रत्येक घरात जाऊन पूजा केली जाते, ओटी भरली जाते असा साधारण चार दिवस नित्य नियम चालतो. पंचमीला वार्षिक गोंधळ घालून पालखी सोहळा संपन्न होतो. विशेष म्हणजे पालखी बरोबर असणारे अनवाणी चालतात. निर्मळ ग्राम पुरस्कार प्राप्त गाव आहे, तरुण मंडळ पालखी नाचवतात ते पाहण्यासाठी संपूर्ण गाव जमा होतो, पालखी बरोबर भजन केले जाते. आज गावात सुशिक्षित माणसं असून उच्च पदावर नोकरी, व्यवसाय करतात, हीच कृपा आई जानाई व आई ईंजाई हिची आहे, अशी प्रत्येकाची भावना आहे.