अलिबाग शिवसत्ता टाइम्स (धनंजय कवठेकर):-
सामाजिक वनीकरण विभाग, रायगड-अलिबाग व प्रिझम सामाजिक विकास संस्था, अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक वन दिनानिमित्त ग्लोबल वार्मिंग व समुद्र ठिकाणी त्याचा होणारा परिणाम या विषयावर अलिबाग समुद्र किनारी स्थानिकांच्या व पर्यटकांच्या बहुसंख्य उपस्थितीत पथनाट्यातून जनजागृती करण्यात आली. प्लास्टिकचा अतिवापर, विकासाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर सूरू असलेली वृक्षतोड, मोठ-मोठ्या कंपन्या मधून सतत होणारे हवेचे प्रदूषण, वाहतुकीच्या साधनाच्या अति वापरातून उत्सर्जित होणारे घातक व विषारी वायू , विरळ होत चाललेला ओझोनचा थर सतत लागणारे वनवे, नद्यामधील भराव यांसह अनेक कारणामुळे वातावरणातील तापमान वाढत जाऊन ग्लोबल वार्मिंगची समस्या अधिक तीव्र होत आहे.ज्यामुळे अनिश्चित पाऊस, सतत येणारी वादळे, समुद्राच्या पाण्याची पातळी वाढत असल्याने किनारपट्टी लगतचे भूक्षेत्र पाण्याखाली जाण्याची भीती निर्माण झाली असून किनारपट्टी लगतचे जनजीवन, पर्यटन यावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे.
यासाठी वृक्षतोड थांबवली पाहिजे, वृक्षरोपण व वृक्षसंवर्धन केले पाहिजे, अधिकाधिक ई-वाहनांचा वापर केला पाहिजे, प्लास्टिक ऐवजी कापडी व कागदी पिशवी वापरली पाहिजे हे सुंदर अशा पथनाट्यातून सांगितले.