
मुंबई शिवसत्ता टाइम्स (देवेंद्र मोरे) :-
भारतीय चित्रपट सृष्टीच्या चंदेरी पडद्यावरील “भारत” अखेर काळाच्या चक्रव्यूहात…
जेष्ठ अभिनेते, चित्रपट कथा लेखक, दिग्दर्शक, चित्रफीत संकलक हिन्दी चित्रपट रसिकांचे चाहते मनोजकुमार यांनी पश्चिम मुंबईतील कोकिळाबेन अंबानी रुग्णालयात आज दि. ४ एप्रिल २०२५ रोजी सकाळी वयाच्या ८७ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला… अशा महान अष्टपैलू अभिनेत्यास अलविदा करतांना सर्व रसिकांच्या वतीने भावपूर्ण आदरांजली.. !!
मुळच्या हरिकिशन गिरी गोस्वामी उर्फ मनोजकुमार यांचा जन्म २४ जुलै १९३७ मध्ये एबताबाद येथे झाला… फाळणीनंतर एबताबाद पाकिस्तानचा हिस्सा झाल्यावर त्यांच्या आई-वडीलांनी भारताची निवड केली आणि ते निर्वासित भारतवासी म्हणून दिल्लीत राहण्यास आले… फाळणीचे दुःख मनोजकुमार यांनी स्वतः डोळ्यांनी पाहिले…. लहानपणापासून त्यांना अभिनयात रुची होती, तर अशोककुमार, दिलीपकुमार व कामिनी कौशल यांचे ते चाहते होते…. ग्लॅमर विश्वात त्यांचे पाऊल पडताच त्यांची नावं बदलत गेली….
भारतीय चित्रपट सृष्टीत पाऊल ठेवताना त्यांनी मनोजकुमार हे नांव धारण केले आणि देशभक्तीपर चित्रपटांची निर्मिती केली…. देशभक्तीपर चित्रपटांच्या निर्मितीत त्यांना बॉलिवूडमध्ये सर्वोच्च मानांकन आहे…. कथानकांच्या अपेक्षावत त्यांनी “भारत” या नावाने वेळोवळी आपल्या भूमिका सादर केल्याने ते “भारत” या नावाने अजरामर झाले…. मात्र आज हा “भारत” काळाने आपल्यातून हिरावून घेतला आहे… मनोजकुमार यांच्या जाण्याने संपूर्ण भारतीय चित्रपट सृष्टीत शोककळा पसरली आहे…. चित्रपट रसिकांना आता मागे राहिला आहे तो त्यांचा वारसा.. म्हणजे त्यांचे अभिनीत चित्रपट….
सन १९५७ मध्ये “फॅशन” या चित्रपटातून पदार्पण करणाऱ्या मनोजकुमार यांचा “कांच की गुडीया” आणि सुप्रसिद्ध निर्माते दिग्दर्शक विजय भट्ट यांचा मनोजकुमार, माला सिन्हा अभिनीत “हिमालय की गोद में” प्रदर्शित झाला आणि मनोजकुमार यांच्या क्रेजी प्रोडक्शन्सला आरंभ झाला… सरकार विरोधी खटला जिंकणारे आज पर्यंतचे “मनोजकुमार” हे एकमेव चित्रपट निर्माते म्हणून सर्वांनाच ज्ञात आहेत…. मनोजकुमार यांच्या धाडसी वृत्तीचे अनेक किस्से आहेत…. “दस नम्बरी” या चित्रपटाच्या विरोधात भारतीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने त्यांच्यावर खटले भरले… अखेर मनोजकुमार यांनी बाजी मारली, कोर्टाने त्यांच्या बाजूने न्याय दिल्याने या “दस नम्बरी” चित्रपटाचा प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला…. पुढे “शोर” चित्रपटाला तर प्रथम दूरदर्शनवरून प्रदर्शित करण्यास भाग पाडले, मात्र पुढे मोठ्या पडद्यावर प्रदर्शित केल्यावर बॉक्स ऑफिसवर त्यांना भारी खोट पदरात घ्यावी लागली होती…. पण देशभक्तीपर चित्रपटांचा त्याचा सिलसिला कायम सुरूच राहिला…. माजी पंतप्रधान इंदिराजी यांच्या बरोबर पुर्वी तसे सख्य होते पण त्यांनी राबवलेली “आणीबाणी” त्यांना मान्य नव्हती त्यातूनच त्यांनी माहिती व प्रसारण मंत्रालया मार्फत ऑफर देऊनही आणीबाणी या विषयावर “डॉक्युमेंटरी” बनविण्यास चक्क नकार दिला….
मनोजकुमार यांनी निर्मिती केलेल्या देशभक्तीपर दस नम्बरी, शोर, उपकार, पत्थर के सनम, रोटी कपडा और मकान, सन्यासी आणि क्रांती यांसारख्या मल्टी स्टार्टर चित्रपटांचा ताफाच आता त्यांची जिवंत आठवण म्हणून आपल्यासाठी मोलाची ठरणार आहे….
या महानायकास शिवसत्ता टाइम्सच्या सर्व परिवारातर्फे त्यांच्या स्मृतीस अभिवादन व भावपूर्ण श्रद्धांजली… !!