रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सुटणार ?… अमित शाह यांच्या रायगड दौऱ्यामुळे आशेचे किरण…

0
26

रायगड शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-

राज्याच्या राजकारणात सध्या सर्वाधिक चर्चेत असलेला विषय म्हणजे रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा…मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १८ जानेवारीला पालकमंत्रिपदाच्या जबाबदाऱ्या वाटप केल्या होत्या. यामध्ये रायगड जिल्ह्यासाठी अदिती तटकरे यांचे नाव घोषित करण्यात आले होते.मात्र या निर्णयावरूनच शिंदे गटातील नाराजीचा विस्फोट झाला.मुख्यमंत्री कार्यालयाकडून पालकमंत्र्यांची यादी जाहीर होताच रायगड जिल्ह्यात खळबळ उडाली. कारण, शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले हे रायगडचे आमदार असून, त्यांच्या समर्थकांना अपेक्षा होती की जिल्ह्याची जबाबदारी त्यांच्याकडे दिली जाईल. मात्र, अदिती तटकरे यांचे नाव जाहीर होताच गोगावले समर्थक आक्रमक झाले. मुंबई-गोवा महामार्गावर त्यांनी रस्ता रोको आंदोलन केले, टायर जाळून रस्ता अडवला. प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली.

या पार्श्वभूमीवर आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या रायगड दौऱ्यामुळे पुन्हा एकदा आशेचे किरण उमटले आहेत. अमित शाह १२ एप्रिलपासून दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर येणार असून, पहिल्याच दिवशी त्यांचा रायगड जिल्ह्याचा दौरा आहे. त्यामुळे रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा त्यांच्या उपस्थितीत सुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अमित शाह यांच्या दौऱ्यात एक महत्त्वाचा भाग म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे यांच्या सुतारवाडी येथील निवासस्थानी होणारे भोजन. रायगड किल्ल्यावरच्या कार्यक्रमानंतर अमित शाह तटकरे कुटुंबियांच्या घरी जेवणासाठी जाणार आहेत. हे भोजन शिष्टाचारापुरते असले तरी, राजकीय दृष्टिकोनातून याला फार मोठे महत्त्व आहे.कारण, अदिती तटकरे या सुनील तटकरे यांच्या कन्या आहेत. त्यांचे नावच रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे शाह यांच्या या दौऱ्यात अदिती तटकरे यांचेच नाव पुन्हा ऐनवेळी अधिकृत केले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. रायगड जिल्ह्यात एकीकडे शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी आपल्या बालेकिल्ल्यात जोरदार ताकद दाखवली आहे. तर दुसरीकडे अदिती तटकरे यांचे दिल्ली-मुंबईत मजबूत नेटवर्क आहे. त्यामुळे हे पद नेमकं कुणाला दिलं जाईल, हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे. काही सूत्रांच्या मते, अमित शाह यांच्याच हस्ते हा तिढा सुटेल आणि अंतिम नाव लवकरच जाहीर होईल. राज्य सरकारच्या अंतर्गत राजकारणावर अमित शाह यांचा प्रभाव आहे, त्यामुळे त्यांच्या शब्दाला प्राधान्य दिलं जाण्याची शक्यता अधिक आहे.