वसई-विरार शिवसत्ता टाइम्स (देवेंद्र मोरे):-
बोरीवली आणि विरार दरम्यानच्या नवीन ५व्या आणि ६व्या मार्गिकेसाठी एकूण १६ हेक्टर जागेची आवश्यकता आहे, त्यासाठी भूसंपादन सर्वैक्षण घेण्यात आला, त्यानुसार स्टेशन्स समिप व्यापारी व रहिवासी संकुलांना रेल्वे प्रशासनाकडून अध्यादेश जारी करण्यात आला आहे. दरम्यान रेल्वे मार्गिका प्रकल्प बाधित रहिवाशांना नोटीसा बजावून जागा खाली करण्यास बजावले आहे, याविरोधात स्थानिकांत एकच हलकल्लोळ उसळला आहे.
वसईतील प्रकल्प बाधित ६ इमारती मधील रहिवाशांना बाजारभावापेक्षा कमी मोबदला जाहीर केल्याने रेल्वे प्रशासनावर स्थानिक प्रकल्पग्रस्त संतप्त नागरिकांकडून रेल्वे प्रशासनावर फसवणूकीचे आरोप करण्यात आले आहेत. या संतप्त नागरिकांनी याविरोधात कोर्टात धाव घेण्याचा निर्णय घेतला असून रेल्वे प्रशासना विरोधात लढा उभारला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
वसई रोड स्टेशन लगतच्या पश्चिमेला आनंदनगर परिसरातील श्रीराम कॉम्प्लेक्स, शिवशक्ती अपार्टमेंट्स, सहयौग अपार्टमेंट्स, आदर्श अपार्टमेंट्स आणि जगदीश कृपा या ५ इमारतींचा समावेश या भूसंपादनात आहे.
प्रकल्पानुसार वसई ते नायगांव दरम्यान ३० ट्रॅक्ससाठी यार्ड तयार करण्यात येणार आहे. या विरोधात रविवारी प्रकल्पग्रस्त आक्रमक नागरिकांकडून रेल्वे प्रशासनाच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. यावेळी प्रसारमाध्यमांना सांगितले की, रेल्वेने भूसंपादन करताना रहिवाशांना बाजारभावाप्रमाणे मोबदला दिला जाईल असे आश्वासन दिले होते. मात्र आता रेडी रेकनर प्रमाणे दर न देता बांधकाम मुल्यांनुसार सरसकट मूल्य जाहीर करून घोर फसवणूक केली आहे. येथील प्रत्येक घराची किंमत ५०-६० लाखांच्या घरात आहे तर दुकानांच्या किंमती एक करोडच्या जवळपास आहेत. मात्र रेल्वेच्या निर्णयानुसार प्रत्येकांस केवळ १०-१५ लाख रुपयेच मिळणार आहेत, असे येथील एक उपस्थित रहिवासी अरुण मालविय यांनी सांगितले.
रेल्वेने काढलेल्या नोटीसा बेकायदेशीर असून भूसंपादनाच्या या प्रक्रियेत त्यामध्ये भरपूर त्रुटी आहेत. या नोटीसा रेल्वे अधिनियम १९८९ आणि २००८च्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आहेत. श्रीराम कॉम्प्लेक्स मध्ये ९०, सहयोग मध्ये ४०, आदर्श मध्ये २१ आणि जगदीश कृपा मध्ये ५० कुटुंबे राहतात आणि या सर्व इमारती ४५ ते ४० वर्षे जुन्या आहेत.
अशोक चौधरी पुढे म्हणाले की, सार्वजनिक बांधकाम खात्याने तयार केलेला अहवाल अपूर्ण व निखालस चुकीचा आहे. वाढीव चटई क्षेत्र, सुविधा, युनिट्स व विकास नियमांच्या पालनाचा यात योग्य विचार करण्यात आलेला नाही, तर केवळ जमिनीचा व बांधकामाचा दर वापरून “वस्तुनिष्ठ” किंमत ठरविण्यात आलेली आहे आणि हे साफ चुकीचे धोरण आहे. फजले हल कुरेशी यांनी सांगितले की आमचा या रेल्वेच्या उपक्रमाला विरोध बिलकुल नाही पण रेल्वेला असा कमी मोबदलाच द्यायचा असेल तर आमच्या घरांच्या बदल्यात तेवढीच घरे आम्हाला उपलब्ध करून देण्यात यावी. अन्यथा आम्ही सर्व रहिवाशांनी रेल्वे प्रशासनाच्या विरोधात कायदेशीर नोटीस बजावली आहेच.