रायगड शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-
रायगड जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाची अवस्था आता केवळ चिंताजनक नसून थेट गंभीर झाली आहे. २२ एप्रिल रोजी घेण्यात आलेली जिल्हा काँग्रेसची आढावा बैठक म्हणजे पक्षाच्या अधोगतीचा जिवंत पुरावा ठरली. पक्ष निरीक्षक राजेश शर्मा यांची उपस्थिती असूनही, ही सभा ‘उरकली’ असं म्हणावं लागेल. त्यामुळे ही बैठक होती की घरगुती कार्यक्रम, असा प्रश्न उपस्थित राहतोय…
सभेचं ‘फ्लॉप’ सिनेमात रुपांतर १५ तालुक्यांचे अध्यक्ष असताना, फक्त दोनच अध्यक्ष हजेरी लावतात? व्यासपीठावर उभे असलेले नेते आणि समोर बसलेले कार्यकर्ते मिळून अवघे ४०-४५ लोक ! इतक्या लोकांसाठी ही बैठक होती का? यातून एक गोष्ट ठामपणे समोर येते जिल्हा काँग्रेसचा कार्यकर्ता हा नेतृत्वावरून पूर्णपणे नाराज आहे…
जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांच्या नेतृत्वाखालील ही बैठक म्हणजे त्यांच्या अपयशाचं ‘लाईव्ह टेलिकास्ट’ वाटले… त्यांच्या नेतृत्वात ना करिष्मा, ना दृष्टी, ना संघटन कौशल्य. कार्यकर्त्यांना प्रेरणा देणे सोडाच, त्यांना बोलावून सभेला आणण्यातही हे नेतृत्व अपयशी ठरतं ही स्थिती धक्कादायक आहे.
पक्ष निरीक्षक राजेश शर्मा, उपस्थिती पाहून चिंतेत… ज्यांच्या समोर हे ‘फ्लॉप शो’ घडलं, ते राजेश शर्मा आता काय भूमिका घेणार हे पाहण्यास उत्सुकता राहिली तर प्रांताध्यक्ष या उपस्थितीचे आत्मचिंतन करतील का ?
पक्ष कार्यकर्ते कुठे आहेत? जिल्ह्यातील हजारो कार्यकर्त्यांपैकी अवघे ४० लोक या बैठकीला येतात, याचा अर्थ स्पष्ट आहे… कार्यकर्ते नेतृत्वावरचा विश्वास गमावत आहेत. त्यांना दिशा हवी आहे, संवाद हवा आहे – पण सध्याचं नेतृत्व हे केवळ ‘बोलघेवडं’ असून, मैदानात उतरण्याची तयारीच नाही…
ही केवळ अधोगती नव्हे, तर ‘तळ गाठण्याची’ चाहूल असून काँग्रेस पक्ष रायगडमध्ये अस्तित्व गमावतोय… लोकसभा, विधानसभा निवडणुका जवळ येत असताना देखील, नेतृत्वाला जाग येत नसेल, तर पक्षाच्या दैनंदिन हालचालींमध्ये ‘अंधाराची सुरुवात’ झालेली मानावी लागेल. या फोटोंमध्ये फक्त ४० लोक आहे तर काँग्रेसच्या भविष्याचा आरसा दिसतो आहे…
जर रायगड काँग्रेसला वाचवायचं असेल, तर केवळ ‘नवीन चेहरे’ नव्हे, तर ‘नवीन दृष्टिकोन’ असणाऱ्या नेत्याची गरज आहे… केवळ सभा न घेता कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा ओतेल, संवाद साधेल, आणि पक्षाला पुन्हा उभारी देईल… तो नेता, अन्यथा हाच ‘फ्लॉप शो’ काँग्रेसच्या अस्तित्वाचा अंतिम अध्याय ठरेल…
काँग्रेसच्या नेतृत्व जर वेळेत शुद्धीवर आले नाही, तर पक्षाला पुन्हा उभं करण्यासाठी कालावधीही पुरेसा उरणार नाही. आता प्रश्न एवढाच, पक्ष वाचवायचा आहे की फक्त मोजक्याच कार्यकर्त्यांची फौज जोपासायची ?