महाराष्ट्रातील एकूण सहा पर्यटकांची अतिरेक्यांकडून भीषण हत्या… जम्मू-काश्मीरच्या पहालगाम येथे गेलेल्या पर्यटकांची ह्रदयद्रावक घटना…

0
28

डोंबिवली शिवसत्ता टाइम्स (शेखर म्हात्रे):-

जम्मू काश्मीरमधल्या पहालगाममध्ये दहशतवादी भ्याड हल्ल्यात मरण पावलेल्या डोंबिवलीच्या तिन्ही नातेवाईकांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.जम्मू काश्मीरमधल्या पहालगाममध्ये मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास पर्यटकांवर पाकिस्तानची TRf नावाच्या दहशतवादी संघटनेने हा आत्मघातकी भ्याड हल्ला करीत तब्बल ४८ निष्पाप पर्यटक नागरिकांवर भीषण गोळीबार करीत हत्या केली.TRF ह्या आतंकी संघटनेच्या टीमने भारतीय सुरक्षा रक्षकांच्या वेषात येऊन सर्व पर्यटकांना धर्म जात विचारून, मुस्लिम प्रार्थना (अजाण नमाज ) पठण करायला सांगितले नंतर सर्व पर्यटकांवर गोळ्या झाडल्या.

महाराष्ट्रातील एकूण ६ पर्यटकांवर गोळ्या झाडून त्यांची निर्घृण हत्या केली. डोंबिवलीचे तिन नागरिक जे एकमेकांचे नातेवाईक होते, पनवेलचा एक नागरिक, पुण्याचे दोन आणि मध्य प्रदेशचा एक नागरिक यांचा या हल्ल्यात बळी गेलेला आहे.काल दुपारी इंडियन एअरलाईन्सच्या विमानाने डोंबिवलीचे संजय लेले, अतुल मोने, हेमंत जोशी, पनवेलचे दिलीप देसले या चौघांचे पार्थिव पहालगाम, जम्मू-काश्मीर येथून मुंबई विमानतळावर आणण्यात आले. यावेळी मंत्री आशिष शेलार, मंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार श्रीकांत शिंदे, प्रदेश प्रभारी रविंद्र चव्हाण, मंत्री गुलाबराव पाटील, दादा भुसे, योगेश कदम, शासनाचे पदाधिकारी आणि पोलीस यांच्या उपस्थिती मध्ये पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करत श्रद्धांजली वाहण्यात आली.

डोंबिवली पश्चिम येथील बागशाळा मैदान येथे संजय लेले, अतुल मोने, आणि हेमंत जोशी या तिघांचे पार्थिव अंतिम दर्शन घेण्यासाठी ठेवण्यात आले.कल्याण-डोंबिवलीत शासनाच्या वतीने बाग शाळा मैदानात अंतिम दर्शनार्थ जय्यत तयारी करण्यात आली. फुलांनी सजवलेल्या तिन ट्रकवर तिघांचेही पार्थिव ठेवण्यात आले. लाखोंच्या संख्येने डोंबिवलीकर संजय लेले, अतुल मोने आणि हेमंत जोशी यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी आले होते.यावेळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार श्रीकांत शिंदे, प्रदेश प्रभारी रविंद्र चव्हाण, समाजसेवक पुंडलिक म्हात्रे, शिवसेना डोंबिवली शहर अध्यक्ष जयेश पुंडलिक म्हात्रे, मा. नगरसेवक दीपेश पुंडलिक म्हात्रे, राहुल श्रीधर म्हात्रे, भाजपा नगरसेवक शैलेश धात्रक, मनीषा शैलेश धात्रक आणि सर्व पक्षीय मंत्री, नेते, खासदार, आमदार, पदाधिकारी, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे अधिकारी, प्रशासक, पोलीस अधिकारी, प्रसार माध्यमे, दहशत वादी हल्ल्यात मृत्यूमुखी झालेल्यांचे नातेवाईक, मित्र मंडळी आणि नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

हेमंत जोशी, अतुल मोने, संजय लेले यांच्या पार्थिवांवर डोंबिवली राम नगर येथील शिव धाम हिंदू स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात आले.तिघांच्या मुलांनी मुखाग्नी दिला. यावेळी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत, अमर रहे.. अमर रहे शहीद नागरिक अमर रहे!  आणि पाकिस्तानचा निषेध करीत पाकिस्तानचा राष्ट्रध्वज यावेळी  जाळण्यात आला.बाग शाळा मैदान येथून राम नगर डोंबिवली अशी अंतिम यात्रा फुलांच्या सजवलेल्या ट्रकवरून काढण्यात आली.मुंबई, डोंबिवली, ठाणे, नवी मुंबई, रायगड, नाशिक, पुणे, नागपूर, कोल्हापूर, अहिल्या नगर, औरंगाबाद, नांदेड या ठिकाणी घटनेच्या निषेधार्थ निदर्शने करण्यात आली. पाकिस्तान आणि आतंकवाद्यांच्या विरुद्ध घोषणा देण्यात आल्या.मुंबई मंत्रालयात तृतीय-पंथींच्या वतीने आतंकी हल्ल्याच्या निषेधार्थ निदर्शने करण्यात आली. डोंबिवली शहरात अक्षरशः बंद पाळण्यात आला. संपूर्ण डोंबिवली शहर शोकाकुल वातावरणात होते.