रात्रीच्या काळोखात ६८ कासवांच्या पिल्लांचा समुद्राकडे प्रवास… ५२ दिवसांनी बाहेर आली अंड्यातून पिल्ले

0
18

अलिबाग शिवसत्ता टाइम्स (धनंजय कवठेकर):- 

किहिम समुद्र किनारी ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवाची ६८ पिल्लांचा रात्रीच्या अंधारात समुद्राकडे प्रवास सुरु झाला आहे… अखेर तो क्षण जवळ आल्यानंतर या क्षणाचा आनंद किहिम ग्रामस्थांनी जल्लोष करीत सादर केला…मागील अनेक वर्षापासून ऑलिव्ह रिडले जातीची कासवं मुंबई आणि अलिबागच्या समुद्र किनारी नाहीशी झाली होती, आजच्या घटनेने येथील पर्यावरणात रक्षणात यश येत असल्याचे दिसून येत आहे…

मागील ५२ दिवस किहिम ग्रामस्थ आणि वनविभागाचे कर्मचारी दिवसरात्र या घरट्यांचे रक्षण करीत होते आणि तो क्षण शुक्रवारी सायंकाळी ५.०० वाजता जवळ आला, याच दरम्यान घरट्यात हालचाल होत असल्याचे रक्षकाच्या लक्षात आले. त्यानंतर एकएक पिल्लू घरट्यातून बाहेर पडण्यास सुरुवात झाली. ८ वाजेपर्यंत ६८ पिल्ले बाहेर आली होती, या सर्वांना किहिमचे सरपंच प्रसाद (पिंट्या)गायकवाड, दक्षिण कोकण विभागीय वनअधिकारी कांचन पवार, कांदळवन कक्षाचे वनक्षेत्रपाल समिर शिंदे यांच्या हस्ते समुद्रात किहीम समुद्र समुद्रात सोडण्यात आले. अद्याप साधारण ६० पिल्ले बाहेर येण्याची शक्यता आहे. या पिल्लांचे स्वागत मोठ्या उत्साहात केले जाईल, असे किहिम ग्रामपंचायत सरपंच प्रसाद (पिंट्या) गायकवाड यांनी सांगितले. येथील समुद्र किनाऱ्यावरील स्वच्छता ठेवण्यात यश येत असल्याचे हे धोतक आहे. एकेकाळी अलिाबगच्या समुद्रकिनारी मोठ्या प्रमाणात ऑलिव्ह रिडले जातीची कासवं अंडी घालण्यासाठी येत असत, परंतु वाढत्या प्रदुषणामुळे यात पुर्णपणे खंड पडला होता, असे त्यांनी सांगितले. ३ मार्च रोजी दुपारी एका ऑलिव्ह रिडले जातीची मादी अंडी घालत असल्याचे येथील नागरिकांच्या लक्षात आले होते.अंडी घातल्यानंतर मादी कासव समुद्रात निघून गेले. या अंड्याचे योग्य पद्धतीने जतन करण्यासाठी कांदळवन कक्षाने उपाययोजना आखत २४ तास पहारा ठेवला होता.