माणगाव शिवसत्ता टाइम्स (नरेश पाटील):-
काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तानपुरस्कृत दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात बळी पडलेल्या २६ निष्पाप भारतीय पर्यटकांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी व हल्ल्याचा निषेध नोंदवण्यासाठी शुक्रवारी दि.25 रोजी सायंकाळी उशिरा माणगाव येथे भाजप युवा मोर्चा दक्षिण रायगडच्या वतीने भव्य मशाल मोर्चाचे आयोजन करण्यात आले.
या मोर्चाला माणगावकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. बालाजी मंदिर येथून सुरुवात झालेल्या या मशाल मोर्चाने निजामपूर कॉर्नरमार्गे उपविभागीय अधिकारी कार्यालयापर्यंत मार्गक्रमण केले. मोर्चादरम्यान पाकिस्तानचा निषेध करत संतप्त घोषणाबाजी करण्यात आली आणि पाकिस्तानचा झेंडा जाळण्यात आला.
मुख्य बाजारपेठ, कचेरी रोड मार्गे पुढे जात मोर्चा वीर यशवंत धाडगे यांच्या पुतळ्याजवळ विसावला. तेथे दहशतवादी हल्ल्यात हौतात्म्यांची स्मृती जपत दोन मिनिटांचे मौन पाळण्यात आले.
कार्यक्रमात विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करत हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला. या क्रूर घटनेमुळे देशभरात संतापाचे वातावरण असून हुतात्म्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आपण सहभागी असल्याचे त्यांनी सांगितले.
या मोर्चात भाजपचे तालुका अध्यक्ष परेश सांगले, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे माजी नगराध्यक्ष आनंद शेट यादव, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) चे तालुका अध्यक्ष गजानन अधिकारी, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण बाळा दळवी, चॅरिझेन फाउंडेशनचे प्रमुख (माजी सैन्य दलाचे कॅप्टन) एन. एस. रांधवा, सीनियर सिटीझन्स फोरम, कोकण उत्तर भारतीय एकता मंचाचे डॉ. नरेंद्र सिंह, राष्ट्र सेविका समिती, एकता मित्र मंडळ (खांदाड) चे प्रभारी अध्यक्ष सुनील धुमाळ यांच्यासह विविध पक्ष, संघटनाचे पदाधिकारी, सदस्य,मित्रमंडळे, सामाजिक संस्था आणि शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या मशाल मोर्चाचे नेतृत्व भाजप युवा मोर्चा रायगडचे अध्यक्ष निलेश थोरेंनी केले. त्यांनीच सर्व पक्ष आणि संस्थांशी संपर्क साधून त्यांना सहभागी होण्याचे आवाहन केले होते. मोर्चाचे सूत्रसंचालनही त्यांनीच करत आभार प्रदर्शन केले.शांततेत पार पडलेल्या या मशाल मोर्चातून माणगावकरांचा संताप आणि हुतात्म्यांप्रतीची कृतज्ञता स्पष्टपणे दिसून आली. हातात मशाली, घोषणा, बॅनर्स व पोस्टर्स घेतलेले नागरिक हे माणगावच्या एकजुटीचे प्रतीक ठरले.