अलिबाग शिवसत्ता टाइम्स (धनंजय कवठेकर):-
कावीर ग्रामपंचायत हद्दीतील सुरू असलेल्या RMC प्लांटविरोधात ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजीचा सूर उमटला आहे. गेल्या काही महिन्यांपासून सदर प्रकल्पामुळे गावातील लहान बालकांच्या, वृद्ध नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याचे निदर्शनास आल्याने ग्रामस्थांनी या प्रकल्पाविरोधात आवाज बुलंद केला आहे.
अमित अशोक म्हात्रे या ग्रामस्थाने जिल्हाधिकारी रायगड यांच्याकडे सातत्याने पाठपुरावे करून तक्रार नोंदवली आहे. ३० जानेवारी २०२५ रोजी मूळ पत्र देण्यात आले असून त्यानंतर १० फेब्रुवारी, २५ फेब्रुवारी, ११ मार्च आणि २५ मार्च रोजी एकूण पाच पाठपुरावा पत्रे पाठवूनही अद्याप प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही झाली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
गेल्या महिनाभरातही कोणतेही उत्तर आलेले नाही. दरम्यान, RMC प्लांटचे काम मात्र जोरात सुरू आहे. गावातील हवेत धूळ आणि प्रदूषण यामुळे श्वसन विकारांची शक्यता वाढली आहे. लहान मुलांचे आरोग्य आणि वृद्धांची तब्येत धोक्यात येऊ लागली आहे. जर आमच्या बाळांना आणि वयस्करांना त्रास होणार असेल, तर आम्ही हा प्रकल्प होऊ देणार नाही,” असा ठाम इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
या प्रकल्पाच्या विरोधात गावकऱ्यांनी एकजूट दाखवून, प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी अशी मागणी केली आहे. अन्यथा गावकरी पुढील काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देत आहेत.कावीर ग्रामपंचायतीच्या हद्दीत सुरू असलेल्या या प्रकल्पाचा पर्यावरण आणि आरोग्यावर होणारा परिणाम लक्षात घेता प्रशासनाने तातडीने निर्णय घेण्याची गरज आहे, अन्यथा येत्या काळात ग्रामस्थांच्या संतापाला सामोरे जावे लागेल, हे स्पष्ट झाले आहे.